नगर -तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जेचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्याला शालेय साहित्याची गरज असते. शालेय साहित्यापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी नगर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना 50 हजार वह्यांचे वाटप करणार आहे, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
आमदार संग्राम जगताप यांच्यातर्फे प्रेरणा प्रतिष्ठानातर्फे विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक अजिंक्य बोरकर, विलास कराळे, गोरख खांदवे, मीना कराळे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, “”कुठल्याही गरजू विद्यार्थ्याला वह्यांची कमतरता भासू देणार नाही. करोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु तितकेच त्याचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे सरकारने विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची पालकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
घरी राहूनच विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. अभ्यासातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व घडले जाते.” आमदार जगताप यांना अलिकडेच वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी वह्या द्याव्यात, असे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या भेटींच्या वह्यांमध्ये तेवढ्याच वह्या प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणार आहेत.