नवी दिल्ली – दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी शहरातील पोलिस दल उद्धवस्त केले असून त्यातून दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीची वाट लागली आहे असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी गेल्या काही दिवसांत नोंदवलेल्या काही गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख केला.
जाफ्राबादमध्ये अनेक लोकांच्या समोर एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती, ज्याची हत्या करण्यात आली तो एका खूनाच्या प्रकरणात साक्षीदार होता व त्याच्यावर यापुर्वीही अनेक वेळा हल्ले करण्यात आले हेाते. अशाच स्वरूपाचे अनेक गंभीर प्रकार शहरात घडले आहेत असे ते म्हणाले.
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की दिल्लीमध्ये देशातील सर्वात जास्त गुन्हेगारी दर आहे. गुन्ह्याचे हे प्रमाण दर एक लाख लोकसंख्येसाठी, १८३२ गुन्हे इतके आहे जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा सात पट जास्त आहे.
यातून राज्यपाल सक्सेना यांची अकार्यक्षमता स्पष्ट होते. पोलिस आणि डीडीए (दिल्ली विकास प्राधिकरण) हे दोन्ही विभाग नायब राज्यपालांच्याच अखत्यारीत येतात पण हे दोन्ही विभाग अकार्यक्षम ठरले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यपाल सक्सेना पोलिसांवर देखरेख करण्यास सक्षम नाहीत असा आरोप त्यांनी केला.सक्सेना यांनी आपल्या कामाची जबाबदारी पार पाडावी आणि दिल्ली सरकारच्या कामातील हस्तक्षेप थांबवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.