नगर – केंद्र व राज्य शासनाकडून दलित वस्त्यांचा विकास व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. शहरातील दलितवस्तीचा विकास व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, हा निधी अन्यत्र वळविण्यात आला असून, तो अपेक्षित ठिकाणीच खर्च व्हावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी केली.
रेल्वेस्टेशन परिसरातील आदर्श गौतमनगर (अचानक वस्ती) येथे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक दीपक खैरे, नगरसेविका सुवर्णा जाधव, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, नीलेश बांगरे, आदींनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रभाग क्र. 15 मधील रेल्वेस्टेशन परिसरातील आदर्श गौतमनगर (अचानक वस्ती) येथे सुमारे 51 लाख रुपयांचा निधी मुलभूत सुविधांसाठी मंजूर झाला होता. परंतु हा निधी केडगाव परिसरातील सावली सोसायटी येथे वर्ग करण्यात आला. अचानकवस्ती येथे दोन दिवसांच्या पावसाने घरात पाणी शिरले.
हक्काचा निधी आम्हाला परत मिळवून द्या, अन्यथा मनपामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक गायकवाड यांनी दिला. अनिल शिंदे म्हणाले, “”दलितवस्तीचा विकास व्हावा, यासाठी आम्ही जिल्हा नियोजनमधून प्रभाग क्र. 15 मध्ये मोठा निधी मंजूर करुन आणला होता. परंतु काहींनी तो निधी इतरत्र वळविला आहे. तरी तो निधी पुन्हा या ठिकाणी घेऊन या भागातील कामे मार्गी लावावीत.”