गुवाहाटी – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आसामच्या धुबरी येथे आज मतदान झाले. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये या जागेवरून बदरूद्दीन अजमल यांचा विजय होतो आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ४०० पारच्या नाऱ्यात अजमल यांचा विजय होणार का हे पुढच्या महिन्यात स्पष्ट होईल, मात्र त्यांनी आजच आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट अर्थात एआययूडीएफचे उमेदवार असणाऱ्या अजमल यांची देशातल्या सगळ्यांत श्रीमंत उमेदवारांमध्ये गणना होते. यावेळी आपण पूर्वीपेक्षा अधिक मतांनी निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी एका वाहिनीशी बोलताना केला. कॉंग्रेसचे अखिल गोगोई यांनी मुस्लिमांसाठी तुम्ही गद्दार आहात असे म्हटले आहे त्याबाबत विचारल्यावर अजमल म्हणाले ही विचित्र गोष्ट आहे आणि यासंदर्भात माझा काय न्याय करायचा हे मुसलमानांवरच सोडतो. मी धर्माच्या नाही तर कामाच्या नावावर मते मागतो. त्यामुळेच कॉंग्रेसला हे पसंत नाही व ते मला हटवण्याच्या प्रयत्नात आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याकडून तुम्हाला सतत लक्ष्य केले जाते आहे असे विचारल्यावर अजमल म्हणाले की, सरमा यांच्या डोक्यावर पंतप्रधान मोदी यांचा हात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र योगी जे करतात तेच सरमाही करतील. जो पर्यंत ते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चिवर आहेत तोपर्यंत माझ्यावर टीका करत राहतील. त्यात वाईट मानून घेण्यासारखे काय आहे?
Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाची चंद्राबाबू नायडूंना सक्त ताकीद, समोर आलं ‘हे’ कारण….
ते पुढे म्हणाले भाजप आमचा मोठा शत्रू आहे. मात्र कॉंग्रेस पक्ष त्यापेक्षा मोठा शत्रू आहे. राम मंदिराबाबत स्वत: प्रियंका गांधीही म्हणाल्या आहेत की मंदिरात त्यांच्या आजी आणि त्यांच्या पित्याचे मोठे योगदान आहे. राजीव गांधी यांच्या काळातच मशिदीचे कुलूप काढल्याचे ते सांगतात.