कार्ला (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील लग्नसोहळे हे चर्चेचा विषय झाले असून लग्नात होत असलेला खर्च कमी करावा व हा पैसा गावातील शाळा डिजीटल करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन हभप निवृती महाराज देशमुख यांनी बोरज येथे कीर्तनरुपी सेवा देत असताना मावळकरांना केले.
बोरज येथे आयोजित एका कार्यक्रमात निवृती महाराज देशमुख यांंचे कीर्तन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी समाजात होत असलेल्या विविध ज्वलंत विषयावर भाष्य केले. आपण आपल्या संस्कृतीला कसे संपवत आहोत, याची अनेक उदाहरणे देत संस्कृतीचे जतन करा व आपले आयुष्य सुंदर करा असे सांगितले.
या वेळी कार्ला परिसरातील सांप्रादायिक क्षेत्राबरोबर अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष केदारी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.