शंकर दुपारगुडे
कोपरगाव -भाजप प्रणित सरकार कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष केले जात आहे. तसेच विरोधी राज्यात सत्ताधाऱ्यांना राज्यपालांच्या माध्यमातून हस्तक्षेप करीत आडकाठी आणले जात आहे. सत्तेच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यास भाग पाडले जाते, हे उघड सत्य आहे. हे आता कुठेही लपुन राहीले नाही. केवळ आमच्यासारख्या नेत्यांनाच हा प्रश्न काय विचारता अगदी खेड्यातील पारावराच्या माणसाला जरी विचारले तरी ते देखील हे सांगतील, अशा शब्दांत आ. बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढला.
येथील ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आ. थोरात कोपरगावला आले असता ते दैनिक “प्रभात’ शी बोलत होते. ते म्हणाले की, देशातल्या स्वायत्त संस्था अर्थात तपास यंत्रणा कुणाच्या सांगण्यावरून काम करतात, कशी कारवाई करतात किंवा कोणावर कारवाई करतात. सत्ताधाऱ्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. हे आता कुठेही लपुन राहीले नाही.
केंद्रीय तपास यंत्रणांचा सत्ताधारी गैरवापर करीत आहे का? यावर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर देवून सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला. केंद्रात आणि राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना सुडबध्दीने आडकविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. ईडी, सीबीआयसह इतर यंत्रणांनी आजपर्यंत केलेल्या अनेक कारवाईतून विरोधकांना लक्ष केल्याचे उघड होत आहे. तसेच संबधीत व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला क्लिनचीट दिली जाते. या तपास यंत्रणांच्या कारवाईवर सर्वसामान्य नागरीक चकीत होत आहे. अशीच भावना आ. थोरात यांनी व्यक्त केली.
…तरी चौकीदार सक्षम ः डॉ. खा. सुजय विखे
दरम्यान या संदर्भात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा केली असता. ते म्हणाले की, जे राजकीय नेते आता विरोधात बसले आहेत. त्यांना कोणत्याही तपास यंत्रणेने विरोधात बसवले नाही. तर त्यांच्या राज्यातील, जिल्ह्यातील व तालुक्यातील जनतेने विरोधात बसवले आहे. विरोधी पक्ष कोण व्हावा, हे जनता ठरवते. तपास यंत्रणा ठरवत नाही. सध्याचे जे विरोधक आहेत ते सत्तेत असताना केलेल्या भ्रष्टाचारामुळे जनतेने त्यांना विरोधात बसवले. आता त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होत आहे. आपले उघड पडू नये म्हणून सर्व विरोधक एकत्र झाले आहेत. जरी सर्व चोर एकत्र झाले तरी देशाचा चौकीदार तितकाच सक्षम पध्दतीने काम करणार आहे, असे म्हणत देशासह राज्यातील विरोधकांना डॉ. खा. विखे यांनी टोला लगावला आहे.