करोनामुळे निर्माण झालेल्या मंदीचा परिणाम
दिवाणी दाव्यात तडजोडीला पसंती
पुणे – करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती…नोकरी, व्यवसायातील अनिश्चितता… दाव्यांसाठी लागणारा वेळ… सध्या असलेली गरज…यामुळे दिवाणी दाव्यात तडजोडीबाबत पक्षकारांकडून चौकशी होत आहे. न्यायालय सुरू होताच काही दाव्यांमध्ये बाहेर तडजोड करण्यात येणार असल्याचे न्यायालयात लेखी लिहून देऊन दावा निकाली काढण्याची शक्यता आहे, अशीच दोन प्रकरणे समोर आली आहेत.
पहिला दावा जमिनीसंदर्भातील आहे. तो 2014 पासून प्रलंबित आहे. शेतकऱ्याने प्रथम एका बिल्डरला जमीन विकसित करण्याबाबत नोटरी करार करून दिला. तर, दुसऱ्या बिल्डरला रजिस्टर करारानुसार जमीन दिली. त्या बिल्डरने जमिनीवर कामही सुरू केले. त्यावेळी पहिल्या बिल्डरने आक्षेप घेतला. ऍड. नितीन झंजाड यांच्यामार्फत हे रजिस्टर करार रद्द करण्यासाठी आणि स्पेसिफिक परफॉमन्स आणि मनाई आदेशासाठी दावा दाखल झाला. सहा वर्षांपासून हा दावा प्रलंबित असल्याने जमीन विकसित करता येत नाही. तसेच, करोनामुळे आर्थिक मंदी आली आहे. म्हणून दुसऱ्या बिल्डरने तडजोडीसाठी हात पुढे केला. त्यास पहिल्या बिल्डरने प्रतिसाद दिला. जूनमध्ये दोघांत समझोता होणार असून, याबाबत अर्ज करण्यात येणार आहे.
दुसरा दावा भाऊ-बहीण यांच्यातील असून, तो 2012 पासून प्रलंबित आहे. भावाने वडिलोपार्जित जमीन बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली. तिथे बिल्डरने बांधकामही केले. व्यवहारावेळी बहिणीचे हक्क सोडपत्र लिहून दिले. मात्र, फसवणूक करून घेतल्याचे बहीण सांगत आहे. तिने दावा दाखल केला आहे. या प्रकरणात भावातर्फे ऍड. नितीन झंजाड काम पाहात आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बहिणीच्या मुलाची नोकरी गेली. दावा संपायला अनेक वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे फ्लॅट, काही रकमेसह तडजोड करण्यास बहीण तयार असून आता हे दोघे बहीण-भाऊ दोघेही तडजोडीच्या तयारीत आहेत. याबाबतही न्यायालयाकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
वकील न्यायालयात पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी दावा दाखल करतो. तो वाद तडजोडीअंती मिटत असेल तर भविष्यासाठी चांगलेच आहे. अनेक वर्षे वाट पाहावी लागणार नाही. त्याचा फायदा पक्षकारांना होणार आहे. बऱ्याच प्रकरणात पिढ्यान्पिढा सुनावणी सुरू असते. त्यामध्ये वेळ, पैसा खर्ची होतो. असा वाद घालण्यापेक्षा समझोता होऊन प्रकरण मिटलेलेच चांगले.
– ऍड. नितीन झंजाड, दिवाणी वकील