बीड – “सध्या देशात अन् राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी कधीच सुडाचे राजकारण केले नाही. ते तर प्रेमाचे राजकारण करत होते,’ असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमधील सभेत सरकारवर केला.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही नवाब मलिक यांना अडचणीत आणू इच्छित नाही. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. ज्या लोकांनी आज बीडमध्ये शरद पवार यांचे पोस्टर लावले मी त्यांचे आभार मानतो, त्यांनी शरद पवार बीडमध्ये येणार आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला सांगितले आहे. “कॅग’च्या अहवालाने 7 मोठे घोटाळे समोर आणले आहेत.
द्वारका एक्सप्रेसची कॉस्ट 14 टक्के कशी वाढली असा सवाल कॅगने केला?, आयुष्यमान भारत योजनेत अनेकांनी मोबाइल नंबर रजिस्टर करून भ्रष्टाचार केला. त्यामुळे मयतांच्या टाळूवरचे लोणी कोणी खाल्ले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
“ज्यांची सुरुवात भ्रष्टाचाराला आळा घालण्याची होती त्याचा शेवट कसा होतोय हे आपण पाहतोय. स्वाभिमानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाराज दिल्लीपुढे कधीही झुकले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य उभे केले. त्यांच्या चिरंजीवाने आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडून स्वराज्य टिकवण्याचा प्रयत्न केला, असे सांगताना आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही असेही जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे.