नवी दिल्ली – भारत आणि म्यानमार लष्करांमधील वाढत्या सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर सक्रिय असणाऱ्या नागा बंडखोरांचे जीणे मुश्किल बनले आहे. त्यातून भारतीय सुरक्षा दलांपुढे शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची तयारी सुमारे 60 नागा बंडखोरांनी केल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच एनएससीएन(के) या नागा बंडखोरांच्या गटाने शस्त्रसंधी जाहीर केली. त्याशिवाय, त्या गटाने शांतता चर्चा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी भारत सरकारशी संपर्कही साधला. त्यापाठोपाठ त्या गटाचे सदस्य असणारे बंडखोर हिंसाचाराचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्यास उत्सुक असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागा बंडखोरांचे बहुतांश गट आधीपासूनच चर्चा प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. आता एनएससीएन(के) च्या रूपाने अखेरचा गटही चर्चेच्या टेबलवर येणार आहे. नागालॅंडबरोबरच शेजारच्या आसाम, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांत नागा समुदायाचे वास्तव्य असणारे बरेच भाग आहेत. ते एकत्र करून स्वतंत्र नागालॅंडची निर्मिती व्हावी, या मागणीतून बंडखोरीची लागण झाली.
बंडखोर गटांनी हिंसक कारवाया सुरू केल्याने नागा मुद्द्याने गंभीर वळण घेतले. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवरून शांतता चर्चेची प्रक्रिया हाती घेण्यात आली. आता ती प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आल्याचे चित्र आहे.