मुंबई – BCCI च्या कनिष्ठ क्रिकेट समितीने ICC पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषकासाठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील आगामी तिरंगी मालिकेसाठी निवडकर्त्यांनी अंडर-19 संघाचीही घोषणा केली आहे. भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिका 29 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. तर शेवटचा सामना 10 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.
पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकात उदय सहारन भारताचे नेतृत्व करणार आहे. 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी स्पर्धेसाठी निवडकर्त्यांनी अंडर-19 आशिया कप संघ कायम ठेवला आहे. संघात सध्या आशिया करंडक युवा स्पर्धेत खेळत असलेल्या अनेक खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा सचिन धस व आर्शिन कुलकर्णी (Sachin Dhas and Arshin Kulkarni) यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
ही स्पर्धा मुळ वेळापत्रकानूसार श्रीलंकेत खेळवली जाणार होती, मात्र, श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीने रद्द केल्यामुळे ही स्पर्धा आता दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. आशिया स्पर्धेत यमकदार कामगिरी केलेल्या उदय सहारन याच्याचकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
सौम्य कुमार पांडेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या खेळाडूंशिवाय चार राखीव खेळाडूंनाही संघात संधी मिळाली आहे. तिरंगी मालिकेसाठी तीन खेळाडूंना प्रवासी राखीव म्हणून निवडण्यात आले आहे. यामध्ये प्रेम देवकर, अंश गोसाई आणि महंमद अमान यांचा समावेश आहे.
विश्वकरंडकासाठी भारतीय संघ – उदय सहारन (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर, अवनीश राव, सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला. राखीव खेळाडू – दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.