मुबंई – अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात होत असेलल्या तिन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने रविवारी भारतीय संघ जाहीर केला. गेले एक वर्ष टी-२० संघातून विश्रांती तसेच माघार घेत असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा व प्रमुख फलंदाज विराट कोहली यांनी या मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियात २०२२ साली झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर रोहित व कोहलीने टी-२० क्रिकेट खेळलेले नव्हते.
या दोघांना आगामी जुनमध्ये होत असलेली टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत निवड समितीने या मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे. भारतीय संघ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत असताना गेल्या आठवड्यात निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित व कोहलीशी चर्चा केली होती. त्यावेळी या दोन्ही खेळाडूंनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार असल्याचे बोलले होते. तसेच त्यासाठी सराव व्हावा म्हणून अफगाणिस्तानविरुद्धच्या तिन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीही आपण उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच रविवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत या दोघांच्या संघातील पुनरागमनावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका
(सर्व सामने संध्याकाळी ७ पासून)११ जानेवारी – पहिला सामना, मोहाली
१४ जानेवारी – दुसरा सामना, इंदूर
१७ जानेवारी – तिसरा सामना, बंगळुरु
या दोघांव्यतरीक्त जीतेश शर्मा व संजू सॅमसन या दोघांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. हे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज असूनही केवळ तिन सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांची झालेली निवड आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीनेच करण्यात आली आहे. या संघातून श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच महंमद सिराजलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. येत्या काळात ही मालिका पार पडल्यावर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून त्यासाठी हे खेळाडू तंदुरुस्त तसेच ताजेतवाने राहावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी म्हटले आहे.
संघात अर्शदीप सिंग, आवेश खान व मुकेश कुमार या तिन वेगवान गोलंदाजांचे स्थान कायम ठेवण्यात आले आहे. फिरकीची मदार वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अक्सर पटेल व कुलदीप यादव यांच्यावरच राहणार आहे. भारताच्या टी-२० संघाचे २०२२ सालाच्या अखेरीपासून नेतृत्व करत असलेला अष्टपैलु हार्दिक पंड्या अद्याप दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरला नसल्याने त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.
लक्षवेधी
– इशान किशनचा विचार नाही
– रिंकू व तिलक वर्माचे स्थान कायम
– सलामीसाठी जयस्वालसह गिलचीही निवड
– रोहितसह कोण सुरुवात करणार याकडे लक्ष
– महंमद शमीलाही विश्रांती
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जीतेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्सर पटेल रवी बिष्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.