नवी दिल्ली – भारतीय सशस्त्र दलांकडून वापरण्यात येणारी बहुतांश शस्त्रे स्वदेशी आहेत. संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत अनेक मोठी पावले उचलली गेली आहेत.
स्वावलंबनाशिवाय आपण आपल्या राष्ट्रीय हितांनुसार जागतिक मुद्द्यांवर स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, संरक्षण उपकरणांच्या आयातीवर अवलंबून राहणे हा भारताच्या सामरिक स्वायत्ततेला अडथळा आहे. आयातीमुळे व्यापार संतुलनावर विपरित परिणाम होतो आणि ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहे. स्वावलंबनामुळे केवळ अर्थव्यवस्था मजबूत होते, एवढेच नाही तर रोजगाराच्या अनेक संधीही वाढतात.
गेल्या नऊ वर्षांत संरक्षण क्षेत्राने स्वावलंबन साध्य करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजे सशस्त्र दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या बहुतेक शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतातच केली जाते.
सरकारने उचललेल्या पावलांमध्ये आठ सकारात्मक स्वदेशीकरणाची यादी समाविष्ट आहे. चार याद्या सशस्त्र दलांसाठी लष्करी व्यवहार विभागाच्या आहेत ज्यात सशस्त्र दलांसाठी 410 शस्त्रांचा समावेश आहे, तर आणखी चार याद्या संरक्षण उत्पादन विभागाच्या आहेत. ज्यामध्ये 4,666 शस्त्रे समाविष्ट आहेत.
नव्या युगातला भारत आता स्वदेशी “आयएनएस विक्रांत’, “तेजस’सारखी हलकी लढाऊ विमाने तयार करत आहे. आता देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, याकडेही राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले.