Andhra Pradesh Lok Sabha Election 2024 – निवडणूक रॅलीमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Chief Minister YS Jagan Mohan Reddy) म्हणाले की, मी सर्वांसोबत आहे. मग ते मुस्लिम असो, किंवा अल्पसंख्याक असो. आम्ही कोणताही भेदभाव न करता जनतेचे कल्याण केले आहे. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) मात्र प्रत्येक वेळेस फक्त जाती-धर्माचे राजकारण करतात, अशा शब्दांत आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष आपापल्या भागात जनतेमध्ये जाऊन शक्य ते सर्व दावे व आश्वासने देत आहेत. कुरनूलमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी देखील जनतेला आश्वासन दिले की त्यांचा पक्ष सर्वांसोबत आहे.
जगन मोहन म्हणाले की मुस्लीम आरक्षण असो, एनआरसी, सीएए किंवा अल्पसंख्याकांचा कोणताही मुद्दा असो, वायएसआर काँग्रेस पक्ष त्यांच्या प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच उभा राहील. माझे उद्दिष्ट उपेक्षित समुदायांचे सक्षमीकरण करणे आहे. ते स्वावलंबी व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
निवडणूक प्रचारात जगन मोहन यांनी जनतेला सांगितले की, येत्या ४ दिवसांत कुरुक्षेत्राची लढाई होणार आहे. ही निवडणूक आमदार-खासदार निवडण्यासाठी नाही, ही निवडणूक सध्या सुरू असलेल्या योजना आणि विकासाचे भवितव्य ठरवेल. आम्ही कोणताही भेदभाव न करता लढलो आहोत. इथून पुढेही आमची तीच भूमिका राहील.
चंद्राबाबू नायडूंवर निशाणा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, जर तुम्ही चंद्राबाबू नायडूंना मतदान केले तर आमच्या सरकारने तुमच्या दारात आणलेली सर्व कल्याणकारी कामे तुम्ही थांबवाल. या राज्यात त्यांनी कोणते कल्याण केले, हे कुणा गरीबाला माहीत आहे का? एकीकडे चंद्राबाबू नायडू ४% मुस्लीम आरक्षण हटवणाऱ्या भाजपशी हातमिळवणी करत आहेत, तर दुसरीकडे अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी नवनवीन नाटके करत आहेत. तुम्हीरंग बदलत असलेल्या सरड्यासारखे चंद्राबाबू नायडू पाहिले आहेत का? उलतट आमचा पक्ष जिंकला तर कोणत्याही परिस्थितीत ४ टक्के मुस्लिम आरक्षण कायम राहील.