जालना – जालना लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कुणासोबतही आघाडी किंवा युती नाही, मात्र जालना लोकसभेत स्थानिक पातळीवर स्वाभिमानीने मविआला पाठिंबा दिला आहे. (In Jalna Lok Sabha Constituency Swabhimani Sangathan support Maha Vikas Aghadi)
जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून रावसाहेब दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवीन राजकीय आव्हान उभे राहणार आहे. दरम्यान शेतकरी हितासाठीच आपण मविआला पाठींबा देत असल्याचे स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले.
डाॅ. कल्याण काळे यांच्याबद्दल –
डाॅ. कल्याण काळे हे फुलंब्री मतदारसंघाचे माजी आमदार. त्यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांचा २५८७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये ते पराभूत झाले. मात्र, कॉग्रेस टिकवून धरण्याचे काम त्यांनी केले. डॉ. काळे हे विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक. पुढे बाळासाहेब थोरात यांनी कल्याण काळे यांच्याकडे पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. जालना लोकसभा मतदारसंघात सिल्लोड, फुलंब्री, पैठण आणि शहरातील काही भाग येतो. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील संपर्काच्या जोरावर अधिक पुढे जाता येईल, असा त्यांचा होरा आहे.
रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांनाही सहकार क्षेत्राचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे गावागावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या राजकारणापासून ते गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी अनेक योजना ते तयार करत असतात. खरे तर दोन वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना केल्यानंतर तिसऱ्या वेळी सत्ता विरोधातील रोष एकत्रित करण्यासाठी काळे आता मैदानात उतरले आहेत.