IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. खेळ थांबला तेव्हा इंग्लंड संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 2 बाद 207 अशी मजल मारली आहे. इंग्लंड आता पहिल्या डावात भारतापेक्षा केवळ 238 धावांनी मागे आहे. दुसऱ्या दिवसअखेर ज्यो रूट नऊ धावांवर तर बेन डकेट ( Ben Duckett ) 133 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. डकेटने सामन्यावर इंग्लंडची पकड मजबूत केली आहे. डकेटच्या शतकामुळे अश्विनच्या 500व्या विकेटची चमकही कमी झाली आहे. तिसऱ्या दिवशी सामन्यात टिकून राहण्यासाठी भारताला पहिल्या सत्रात जास्तीत जास्त विकेट्स काढाव्या लागतील.
That’s Stumps on Day 2 in Rajkot!
England move to 207/2, trail by 238 runs.
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qZgkVvcNg7
— BCCI (@BCCI) February 16, 2024
अश्विनची कसोटीतील 500वी विकेट
मोहम्मद सिराजने भारताला दुसरे यश मिळवून दिले. 30व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने ऑली पोपला बाद केले. पोप 55 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. त्याने बे न डकेटसोबत दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. त्याआधी इंग्लंडला 13.1 षटकात पहिला धक्का 89 धावांवर बसला.
IND vs ENG 3rd Test Day 2 : राजकोटमध्ये फिरकीपटू ‘रवी अश्विन’ने रचला मोठा इतिहास…
रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) जॅक क्रॉलीला 15 धावांवर रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. अश्विनची कसोटीतील ही 500वी विकेट होती. हा आकडा गाठणारा तो नववा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. भारतीय माजी फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर कसोटीत 619 विकेट्स आहेत.
इंग्लंडने डावाच्या आधीच खाते उघडले…
भारतीय फलंदाजीचा डाव संपल्यानंतर एकही चेंडू न खेळता इंग्लंडच्या धावफलकावर पाच धावा होत्या. वास्तविक, अश्विन त्याच्या डावात खेळपट्टीच्या मध्यभागी धावताना दिसला. त्यामुळे भारताला दंड ठोठावण्यात आला आणि अंपायर जोएल विल्सन यांनी इंग्लंडला पाच धावा बहाल केल्या.
भारताचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला…
आज या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला. तत्पूर्वी, भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 5 बाद 326 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे पहिल्या दिवसाचे नाबाद फलंदाज लवकरच पॅव्हेलियनकडे वळले. मात्र यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. ध्रुव जुरेल व्यतिरिक्त रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी छोट्या पण महत्त्वाच्या खेळी खेळल्या.
331 धावांच्या स्कोअरवर भारतीय संघाला सहावा धक्का बसला. कुलदीप यादव 4 धावा करून जिमी अँडरसनचा बळी ठरला. त्यानंतर लगेचच रवींद्र जडेजा बाद झाला. रवींद्र जडेजाला जो रूटने बाद केले. भारतीय अष्टपैलू खेळाडूने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. यानंतर ध्रुव जुरेल आणि रवी अश्विन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ध्रुव जुरेल 104 चेंडूत 46 धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवी अश्विन 37 धावा करून रेहान अहमदचा बळी ठरला. जसप्रीत बुमराहने 26 धावांचे उपयुक्त योगदान दिले.
पहिल्या दिवशी रोहित शर्मानंतर सरफराज चमकला
याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. भारतीय कर्णधाराने 196 चेंडूत 131 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी सरफराज खानने पदार्पणाच्या कसोटीत 62 धावांची झंझावती खेळी केली.
इंग्लिश गोलंदाजांची कामगिरी..
इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्क वुड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मार्क वुडने टीम इंडियाच्या 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. रेहान अहमदला 2 यश मिळाले. जिमी अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.