नगर – केंद्रामध्ये आरएसएस प्रणित भाजपचे मोदी सरकार आल्यापासून देशामध्ये मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. मोदी सरकारला संविधानच मान्य नसून समानतेचा विचार मांडणारे संविधानच बदलून टाकण्याच षडयंत्र देशात सुरू आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी केले आहे.
मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचाराच्या विरोधात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून याबाबत नगर शहरामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. कानडे बोलत होते. मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून अभिवादन करत कॉंग्रेसच्या वतीने शांततामय पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, कॉंग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, नगर शहर मागासवर्गीय सेलचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, नगर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, ज्येष्ठ नेते विजु परदेशी, विशाल कळमकर, प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबुज, जिल्हा सरचिटणीस माणिकराव मोरे, अशोक कानडे, जिल्हा सचिव मनसुख संचेती आदी उपस्थित होते.