मिलन म्हेत्रे
पुणे -दिवाळी जवळ आली की… “घ्याऽऽऽ लक्षुमीऽऽऽऽ’ हा आवाज कानावर येतो आणि मग लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या या “लक्ष्मी’ची म्हणजेच केरसुणीची आठवण आपल्याला येतो. मात्र, या केरसुण्या बनवण्याचे कौशल्य आणि त्यासाठी दिवाळीपूर्वी दीन-दोन महिन्यांपासून सुरू असलेली धडपड… एका वेगळ्या अर्थकारणाकडे आपल्याला घेऊन जाते.
दिवाळीदरम्यान केरसुणीला सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन दिवसांत याचे पूजन होते आणि त्यापूर्वी केवळ 15 ते 20 दिवस या केरसुणीची विक्री बाजारात होते. दिवाळीबरोबरच लग्नसराईच्या काळात या केरसुण्यांना बऱ्यापैकी मागणी असते. अलीकडच्या काळात मोठ्या शहरांमध्येही केरसुण्या बनवल्या जातात; पण मातंग बांधवांकडे पिढ्यान् पिढ्या केरसुण्या बनवण्याची असलेली हातोटी आणि या समाजाचे या व्यवसायातील प्रभुत्व आजही अबाधित आहे. या लक्ष्मीला फडा, केरसुणी, झाडू, साळोता असेही म्हटले जाते.
केरसुणीची मागणी बाजारात काही लाखांचे आर्थिक समीकरण तयार करीत असली तरी त्या बनवणाऱ्या मातंग समाजबांधवांच्या हाती नक्की काय पडते, हा विचार करायला लावणारा विषय आहे. केरसुणी बनवण्यासाठीचे कष्ट आणि मिळणारे उत्पन्न यांचा मेळ घालताना वर्षभराचा उदरनिर्वाह कसा चालणार, हाच प्रश्न या केरसुण्या बनवणाऱ्या मातंग समाजाच्या बांधवांसमोर आहे. यावर्षी करोनाचे सावट सर्वच सणांवर आहे. ते दिवाळीवरही दिसून येत आहे. त्याचा परिणामही केरसुणी विक्रीवर होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आधीच अल्प मोबदल्यात अल्प काळासाठी असणारा हा व्यवसाय यंदा अधिकच तोट्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केरसुणीची किंमत केवळ 35 रुपये
महाराष्ट्रात मातंग समाजबांधव, आंध्रमध्ये येरुकुला-कुचीकर जमातीच्या लोकांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. दिवाळी आधी दीड-दोन महिने केरसुणी बनवण्यास सुरुवात केली जाते. दिवसाला 70-80 केरसुण्या बनवल्या जातात. एका केरसुणीची किंमत साधारण 34 ते 40 रुपये आहे. त्यामानाने “ब्रॅण्डेड’ केरसुण्या किंवा झाडू आपण 100 ते 120 रुपयाला एक याप्रमाणे विकत घेतो. या केरसुणीसाठी आपण घासाघीस करतो; पण केरसुण्या बनवण्याची प्रक्रिया पाहिले की लक्षात येतो की, अशा सुबक पद्धतीने बांधलेल्या आणि कौशल्यपूर्ण रीतीने तयार केलेल्या या केरसुणीला दर मात्र कमी मिळतो.
महिलांचे योगदान अधिक
या व्यवसायात केरसुणी बनवण्यापासून विकण्यापर्यंत महिलांचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात केरसुणीच्या व्यवसायामुळे काही अंशी का होईना महिलांना रोजगाराचे साधन निर्माण करून दिले आहे. छोट्या-मोठ्या केरसुण्या, कुंच्या बनवणे हे कौशल्याचे काम आहे आणि मातंग समाजाच्या महिला ते सुबकतेने करतात. एक महिला दिवसाला 8 ते 10 केरसुण्या बनवते. या केरसुण्या बनवल्यावर त्याची मोळी कापडात बांधून शहरी भागात विकण्याचे कामही महिलाच करताना दिसून येतात.
केरसुणी बनवण्याची प्रक्रिया
केरसुणी बनवण्याचे काम दिवाळीच्या आधी सुमारे दीड-दोन महिने आधी काम सुरू होते. यासाठी जुन्नर तालुक्यातील भीमाशंकरमधील जंगलातून किंवा डोंगरमाथ्यावरून शिंदीच्या झाडांच्या झावळ्या- ज्याला बोली भाषेत “फड’ म्हणतात, याचा उपयोग केला जातो. हे फड आणल्यावर त्या 8 ते 10 दिवस कडक उन्हात वाळवाव्या लागतात. त्यानंतर त्याचा काटेरी भाग काढून टाकून पानांची सफाई केली जाते. ही पाने दगडावर विशिष्ट पद्धतीने झोडपून घेतली जातात. मग साधारण एक फुटाचे खांड करून (कापून) त्याचा “बंच’ तयार केला जातो आणि तो कुशलतेने नायलॉनच्या दोऱ्याने बांधला जातो. विविधरंगी दोऱ्यांमुळे याला आकर्षकता येते. पूर्वी या झाडाच्या ओल्या सालांना पीळ घालून त्याचाच दोर बनवून केरसुणी बांधणीसाठी त्याचा वापर केला जायचा.
पूर्वी बांधावर असे फड मोफत मिळायचे; पण आता अर्थकारण बदलले आहे. जंगलातून हे फड आणण्यासाठी मातंग बांधवांना खूप कष्ट करावे लागतात. केरसुणी बनवण्यासाठी खर्च खूप आणि त्या बदल्यात अल्प मोबदला अशी सध्याची स्थिती आहे. या बांधवांकडे शेती नाही, बॅंकेत खाते नाही, त्यामुळे सरकारी योजनांपासून ते वंचित आहे. या व्यवसायात फायदा नसल्याने नवीन पिढीही याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा व्यवसाय कालबाह्य होऊ नये यासाठी सरकारी प्रयत्न आवश्यक आहेत.
– काशीनाथ आल्हाट, संस्थापक-अध्यक्ष,
हलगी सम्राट केरबा पाटील संस्था, नारायणगाव (ता. जुन्नर)
परराज्यातून येतो कच्चा माल
पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि इंदापूर तालुक्यातील भादलवाडी परिसरात पूर्वी शिंदीची झाडे भरपूर प्रमाणात होती; पण अलीकडच्या काळात जंगलांचा ऱ्हास झाला आणि ही झाडे कमी झाली, त्यामुळे आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून हा कच्चा माल आणावा लागतो आहे.