चेन्नई – करोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाने पसरलेल्या कोविड-19 च्या साथीमुळे यावर्षी नक्की किती ग्राहक मिळतील, याची खात्री नसल्याने आणि अनेक राज्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचे आदेश काढल्याने यावर्षी फटाकेनिर्मितीचे भारतातील माहेरघर म्हणून ओळखल्या जात असलेल्या शिवकाशीतच फटाके उत्पादन निम्म्यावर आले आहे. करोनाव्हायरसमुळे होणारे आजार श्वसनाशी निगडीत असल्याने आणि फटाक्यांच्या धुराने व वासाने श्वसन रोग बळावत असल्याने फटाके उत्पादकांना ग्राहक मिळण्याची खात्री नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून फटाके उत्पादन निम्म्याच क्षमतेने सुरु असल्याचे समजते.
प्रदूषण आणि थंडीमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने फटाका उद्योगाची उलाढाल खूप कमी होईल. देशभरातील ही बाजारपेठ पाच हजार कोटी रुपयांची असते. ती निम्म्यावर आली आहे. अशातच चीनमधूनही स्वस्तातले फटाके बाजारात येत असल्याने ग्राहक तिकडेही वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज शक्यतो ऐकू येणार नाही, असेच सध्या चित्र आहे.
देशात बहुतांश फटाके हाताने बनविले जातात. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक उत्पादकांनी कामगारांना कामावर बोलावले नाही. काम सुरू झाले तेव्हा अतिवृष्टीमुळे फटाके वाळणे आणि त्याची पॅकिंग करणे शक्य नव्हते. परिणामी या क्षेत्रातील सारी गणिते बिघडली आहेत. या वर्षी कोरोनामुळे प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नयेत असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहक येईल का, अशी शंकाही उत्पादकांच्या मनात आहे.
शिवकाशी येथे सर्वाधिक फटाक्याचे उत्पादन होते. तसेच मराठवाडयात तेरखेडा या गावात फटक्यांचे अनेक कारखाने आहेत. लातूर आणि बीड जिल्ह्यातही काही कारखाने आहेत. सुतळी बॉम्ब, फुलबाजी आणि वाजणारे तोटे येथे तयार होतात. कोरोनाकाळात कामगारांना बोलावणे शक्य नव्हते. ज्या भागात हे कारखाने असतात तेथे वीजही घेता येत नाही. प्रत्येक उत्पादन तयार करण्यासाठी स्वतंत्र खोल्या लागतात. अशी पायाभूत सुविधा जमीन अधिक असेल तरच करता येते. या वर्षी संकटाची साखळीच सुरू आहे. त्यामुळे फटाक्याची उलाढाल फार होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवाकाशी येथून कच्चा माल खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या मते तेथील सुमारे 500 कारखाने बंद आहेत. त्यामुळे उत्पादन घटले आहे.