मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतिहासावरून सुरु झालेला वाद आता आणखी विकोपाला जात असल्याचे दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना संभाजी ब्रिगेडने आव्हान दिले आहे.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असा टोला आखरे यांनी लगावला आहे. इतकच नाही तर आखरे यांनी राज यांना चर्चेचे निमंत्रण दिले असून आम्ही खरा इतिहास समोर आणून दाखवू असे म्हटले आहे.
आखरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केली आहे. “राज ठाकरेंनी इतिहासासंदर्भात भाष्य केलं. काहीही माहिती नसताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे. या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचे उच्चाटन करण्याचं काम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झाले आहे.
सर्व बहुजन समाजामध्ये खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आदर आहे. आपण प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारस असला तरी विचारांचे वारसदार होऊ शकला नाहीत. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपण प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहात,” असे आखरे यांनी म्हटले राज ठाकरेंवर टीका करताना म्हटले आहे. तसेच राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये असे आवाहनही आखरे यांनी केले आहे.
“तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू. आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला सत्य इतिहासाचं दर्शन घडवू शकतो. तुम्हाला जे संदर्भ हवे आहेत ते सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आम्ही इतिहास मांडू. तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा. वायफळ चर्चा आणि उगाच जिभेला आलं असं बोलून उगाच महाराष्ट्राला वेठीस धरु नका. महाराष्ट्र पुरोगामी असून महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आहे. तिचं जतन करण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलं आहे,” असा दावाही आखरेंनी केला आहे.