सातारा -अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव यांनी नाशिक जिल्ह्यातील शीतकडा धबधब्यावरील तब्बल 350 फुटांच्या रॅपलिंगचा थरार सुरक्षितपणे अनुभवला. त्यानंतर तिरंगा फडकावित 75 वा भारतीय स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा केला.
ही धाडसी मोहीम सांगली- कोल्हापूर- चिपळूण या पूरग्रस्त भागातील नागरिकांचे प्राण वाचविणारे एनडीआरएफचे जवान आणि टोकियो ऑलम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देणाऱ्या सर्व खेळाडूंना समर्पित केली. या मोहिमेची सुरवात उंभ्रांडे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथून झाली. अर्ध्या तासाची पायपीट करून नदीपात्र ओलांडल्यावर शीतकडा धबधबा येतो. पहिला 10 फुटी खडकाळ टप्पा संपल्यानंतर धबधब्याचे मनात धडकी भरवणारे रौद्ररूप दिसते.
रॅपलिंगच्या उतार झाल्यावर कड्यावर चित्तथरारक अनुभूतीसाठी या ठिकाणी चेहरा खडकाच्या दिशेने आणि पाठ दरीच्या दिशेने करून शरीरावर दोरीच्या सहाय्याने नियंत्रण ठेवून दरीच्या दिशेने झुकावे लागते. हिला 100 फुटांचा टप्पा पार करताना हातातील दोरीवरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते.
शेवटचा 80 फुटांचा टप्पा हा धबधब्याच्या पाण्यातून गेल्याने रॅपलिंगचा हा अनुभव चित्तथरारक ठरतो. अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात साताऱ्याचे गिर्यारोहक रोहित जाधव, जळगावमधील पुणे येथे कार्यरत असलेले प्रदीप बारी आणि नाशिक येथील दर्शन कापडणीस या गिर्यारोहकांनी टीम पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या (नाशिक) चेतन शिंदे, जॉकी साळुंखे, चेतन बेंडकोळी, अमोल तेलंग, सौरव भगत, अर्चना गडदे या गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे मोहीम फत्ते केली.
आव्हानांचा सामना करत मोहीम फत्ते!
तब्बल 350 फुटांचे चित्तथरारक रॅपलिंग, धुक्यात हरवलेला परिसर, मुसळधार पाऊस, ओले कातळकडे, निसरडी पाऊलवाट, शेवाळलेले खडक, हुडहुडी भरवणारी थंडी, कधी दोरीच्या साह्याने तर कधी काठीच्या साह्याने एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे नदीपात्र ओलांडणे, अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती. अनेक संकटांचा सामना करत जाधव यांनी ही मोहीम फत्ते केली.