वडूज – भाजप व त्यांचे समर्थन करणाऱ्या अनेकांना हनुमान चालीसा, रामरक्षा तरी येते का? त्यांच्या पक्षनेतृत्वाने आत्मचिंतन करावे. भाजप आणि 50 खोकेवाल्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याची जहरी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. वडूजनजिकच्या सातेवाडी येथील मधुमाला मंगल कार्यालयात खटाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने झालेल्या जनसंपर्क अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात मिटकरी बोलत होते.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, बाळासाहेब सोळसकर, जितेंद्र पवार, प्रा. बंडा गोडसे, संदीप मांडवे, श्रीमती शशिकला देशमुख, कविता म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमोल मिटकरी म्हणाले, “”राष्ट्रवादी कॉंग्रेस आचार, विचारांवर कार्यरत असणारा पक्ष आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हिताचे कायम निर्णय घेण्यात आले. करोना काळात आरोग्य, अर्थ खाते यशस्वीरित्या सांभाळल्याने त्याची दखल देशातील कॅग संस्थेने घेतली.
राज्यात सर्वाधिक आत्महत्या हिंदू धर्मातील लोक करीत आहेत. त्याकडे या हिंदुत्ववादी लोकांचे दुर्लक्ष आहे. हिंदू धर्मातील विचार, सामाजिक भान, अध्ययनही त्यांच्याकडे दिसत नाही. सत्तेत आलेल्या सरकारमध्ये कोणालाच कोणाला मेळ नसल्याचा कारभार सुरू आहे.” राज्यात लम्पी आजारातून पशुधन वाचविण्यासाठी लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जात नाही. याऊलट गुजरातमध्ये तो पाठविला जातो, त्यामध्येही यांनी काळाबाजार केला असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला. खासदार पाटील म्हणाले, “राज्यातील सर्वसामान्य घटकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादीमुळे मिळाली. तालुक्यावर राष्ट्रवादीचे असणारे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी दक्ष राहवे.’
शशिकांत शिंदे म्हणाले, “खटाव तालुक्यातील एक सेनापती गेला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजूनही एकसंघ आहेत. 50 खोक्यांमध्ये आमच्याही भागातील एक जण सहभागी आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद आगामी काळात कायम ठेवावी.’ खटाव तालुक्यावर राष्ट्रवादीच्या विचारांचा कायम प्रभाव राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असे नंदकुमार मोरे म्हणाले. यावेळी प्रभाकर देशमुख, सुनील माने, प्रदीप विधाते, प्रा. बंडा गोडसे, संदीप मांडवे, जितेंद्र पवार आदींची भाषणे झाली. माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले. प्रा. एस. पी. देशमुख यांनी आभार मानले.