पारनेर – पारनेर तालुक्यातील जवळे येथील सिद्धेश्वर नदीपात्रात अज्ञात कंपनीने पाच ते सहा टॅकर घातक रसायन सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरात रस्त्यालगत नेहमीच असे घातक रसायने सोडली जाते. नदीत सोडलेले हे रसायन एवढे विषारी आहे की, त्यामुळे काही झाडे जळून गेली आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच जनावरे व वन्य पशुपक्षी यांना देखील याचा धोका पोहोचू शकतो, त्यामुळे प्रशासनाने त्वरित संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सिद्धेश्वर नदी पात्रात पुलावररू हे रसायन सोडल्यामुळे परिसरात उग्रवास सुटला आहे. जवळा येथील तिकोणे मळ्याच्या बंधाऱ्यात हे रसायन टाकण्यात आले. याच परिसरात कुकडी वसाहतीच्या पाणीपुरवठ्याची विहीर आहे. त्यामुळे बंधाऱ्यालगत असणाऱ्या तिकोणे व सालकेवस्तीला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. या घातक रसायनामुळे तेथील पिकेही धोक्यात आली आहेत. या संर्दभात ग्रामस्थांनी पाहणी करून याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी तातडीने जवळा येथे येवून तलाठी आकाश जोशी व ग्रामस्थांसमवेत स्थळ पाहणी केली. तसेच दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
या परिसरात एक मोठा दूध प्रक्रिया उद्योग आहे. त्यातून तयार झालेले हे रसायन परिसरात रात्री सोडले जात असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाण्याचे नमुने तपासून संबंधित रसायन सोडणारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्त करत आहेत. संबंधितांवर कारवाई न झाल्यास प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत माहिती लोकजागृती सामाजिक संस्थेला समजताच संस्थेच्या कार्यकत्यांनी पाहणी करून प्रदूषण नियंत्रण खात्याकडे तक्रार केली आहे.