कोपरगाव -उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी तातडीने 70 कोटी रुपये उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
निळवंडे धरणाच्या कालव्यांचे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त काम अपूर्ण असून, या कामाला गती मिळून धरणाच्या लाभक्षेत्रातील अवर्षणग्रस्त भागातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी जलसंपदामंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंगळवारी (दि.23) बैठक पार पडली. या बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. या बैठकीत निळवंडे कालव्यांच्या निधीबाबत येणाऱ्या अडचणी, भूसंपादन, आराखडा याबाबत सखोल चर्चा झाली.
निळवंडे कालव्यांसाठी निधी मिळावा, थांबलेल्या कामाला गती मिळावी, आदी मागण्या आमदार काळे यांनी केल्या. त्यावर ना. पाटील म्हणाले, निळवंडे धरणाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. करोनामुळे मजूर आपल्या गावी गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र काम शीघ्र गतीने पूर्ण व्हावे, यासाठी अद्ययावत मशिनरींची संख्या वाढविण्यात आली असून, कामाला वेग मिळणार आहे.
करोना संकटामुळे निधी उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्या, तरी 105 कोटी पैकी तातडीने 70 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. गरज भासल्यास अधिक निधीची तरतूद देखील करण्यात येणार असून, पुढील आर्थिक वर्षात 325 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जलसंपदामंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याशी देखील चर्चा करून निळवंडे बाबतच्या अडचणी जाणून घेतल्या.