हैदराबाद – दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते म्हणाले की, या मागणीचा प्रस्ताव आम्ही राज्य मंत्रिमंडळात आणि विधानसभेतही संमत करणार आहोत. आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम तेलंगणात मोठ्या स्वरूपात आयोजित केला जाणार असून त्याची योजना चंद्रशेखर राव यांनी आज सादर केली. नरसिंहराव यांनी अत्यंत अवघड काळात देशाची सूत्रे हाती घेताना देशाचे सारे भवितव्यच बदलून टाकले आहे. त्यांच्या कार्याचा देशाने यथोचित सन्मान केला पाहिजे असे ते म्हणाले.
येत्या 28 जूनला नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यादिवशी नरसिंहराव यांच्या हैदराबाद येथील समाधीस्थळी मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी जगात 50 ठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयी आज झालेल्या एका बैठकीत चर्चा करून प्राथमिक आराखडा तयार केला गेला. या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही आमंत्रित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.