मुंबई – रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी मुंबईतून पोलिसांनी अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमूद नाईक आत्महत्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. त्यातच आता मुंबई पोलीसांनी गोस्वामी यांच्यावर एक नवा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, असे आरोप करत गोस्वामींवर आणखी एक नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले”
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर पत्रकार संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोस्वामी यांना वयक्तीक प्रकरणातून अटक झाली आहे, त्याचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. पत्रकारितेची झूल पांघरून वाट्टेल ते उद्योग करणाऱ्यांची पाठराखण आम्ही करू शकत नाही. कायद्याला त्यांचे काम करू देणे हेच बरोबर आहे, असे मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने स्पष्ट केले आहे.