नवी दिल्ली – आर्थिक टंचाईच्या काळातही भारतीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी 6.1 टक्के वेतनवाढ दिली आहे. अर्थात, गेल्या दहा वर्षातील ही सर्वात नीचांकी वेतनवाढ असली तरी पुढील वर्षात ती सरासरी 7.3 टक्के इतकी असेल असा अंदाज एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
एका जागतिक संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कोविडच्या आर्थिक आव्हानाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांच्या पुढे मोठेच आर्थिक आव्हान होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अशा स्थितीत जी वेतनवाढ त्यांना मिळाली आहे ती नीचांक स्वरूपातील आहे.
पुढील वर्षी 87 टक्के कंपन्यांनी मोठी वेतनवाढ देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सन 2009 सालीही कर्मचाऱ्यांना अशीच नीचांकी म्हणजे सरासरी 6.3 टक्के इतकी वेतनवाढ मिळाली होती.
या सर्वेक्षणात ज्या एकूण 1050 कंपन्यांच्या वेतनाचे सर्वेक्षण करण्यात आले त्यातील 45 टक्के कंपन्यांनी यंदा 5 ते 10 टक्के इतकी वेतनवाढ दिली आहे. बाजारातील डिमांड वाढत असल्याने आता उत्पादन वाढीलाही मोठा वाव असल्याने आता पुन्हा कुशल मनुष्यबळाची मोठी गरज वाढू लागली आहे. त्यामुळेच सध्याच्या कर्मचाऱ्यांनाही बऱ्यापैकी वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव अनेक कंपन्यांच्या विचाराधीन आहे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.