नवी दिल्ली : विद्यार्थी आणि तरूणांना सामोरे जाण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही. समाजाच्या सर्व स्तरातील सौर धर्मातील हजारो तरूण रस्त्यावर उतरले. हा तरूणांच्या मनातील राग आणि भीती आहे, असे कॉंग्रेस नेते राहूल गांधी म्हणाले. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीवरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी का आणि एनआरसीचे मुद्दे उकरून काढले जात आहेत, असेही ते म्हणाले.
देशभरातील वातावरण ढवळून निघाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येथे 20 विरोधी पक्षांची संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का), राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तक (एनपीआर) हे पॅकेज घटनाबाह्य असल्याची भूमिका मांडण्यात आली. का रद्द करा. एनआरसी आणि एनपीआर तातडीने रोखा, अशी मागणी विरोधकांनी केली.
कॉंग्रेसच्या पुढाकारातून झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. का, एनपीआर आणि एनआरसीचे पॅकेज गरीब, पददलित, अनुसूचित जाती-जमाती आणि धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारे आहे. एनपीआर म्हणजे एनआरसीसाठीचा आधारच आहे, असा आरोप ठरावात करण्यात आला. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एनआरसीची अंमलबजावणी करणार नसल्याची घोषणा केली आहे. त्या मुख्यमंत्र्यांनी एनपीआरलाही स्थगिती देण्याचा विचार करावा, असे आवाहन ठरावातून करण्यात आले.
देशभरातील निदर्शनांचा संदर्भ देत प्रतिकारासाठीचे धैर्य जागृत झाले असल्याकडे विरोधकांच्या बैठकीतून लक्ष वेधण्यात आले. त्यातून घटनेचे रक्षण करण्यासाठी चालू महिन्यात तीन दिवस शांततामय मार्गाने निदर्शने करण्याचा संकल्पही विरोधकांनी केला. त्यासाठी 23 जानेवारी, 26 जानेवारी आणि 30 जानेवारी हे दिवस निश्चित करण्यात आले. विरोधकांच्या संयुक्त बैठकीमुळे ते मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी एकवटू लागल्याचे चित्र पुढे आले आहे.