नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, ६१ टक्क्यांहून अधिक मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. मतदानाची अंतिम टक्केवारी उद्या (बुधवार) जाहीर केली जाऊ शकते.
दरम्यान, आतापर्यंत ३ टप्प्यांत मिळून २८३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निम्म्या जागांवरील मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान पार पडले. आसाममध्ये सर्वांधिक ७५ टक्के मतदानाची नोंद झाली. त्याखालोखाल गोवा आणि बंगालमध्ये सुमारे ७४ टक्के मतदान झाले.
तर, सर्वांत कमी मतदान महाराष्ट्रात नोंदले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातमधील मतदान प्रक्रिया तिसऱ्या आणि एकाच टप्प्यात पार पडली. तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे १ हजार ३०० हून अधिक उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले.
प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशिवाय दिग्विजय सिंह आणि शिवराजसिंह चौहान या मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यात उत्तरप्रदेश, कर्नाटक, छत्तिसगढ आणि बिहारमध्येही मतदान झाले. देशात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. आता आणखी ४ टप्प्यांसाठीचे मतदान बाकी आहे.