अकोला – साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया. तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणासाठी घरोघरी ‘आमरस’ बेत करण्याचे नियोजन असते. त्यासाठी बाजारपेठेत फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे.
पण यंदाच्या हंगामात हवामान बदलामुळे आंब्याच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे आंब्याच्या पहिला बहरात आंब्यांची आवक नेहमीच्या तुलनेत जवळपास ४० ते ५० टक्के कमी प्रमाणावर झाली आहे.
त्यामुळे बाजारात आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. उर्वरित पान ४ गेल्या पंधरवड्यापूर्वी देवगड हापूसचे प्रती डझन दर १ हजार रुपये होते. ते सध्या ६०० ते ७०० रुपये डझनवर आले आहेत. रत्नागिरी हापूसचे दर ९०० रुपये डझन आहेत.
शहरात आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा, रायचूर, केरळ, कर्नाटक भागातून आंब्याची आवक होत आहे. कच्च्या मालाची सध्या आवक कमी आहे. त्यामुळे सध्या भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त आहेत.
अक्षय तृतीयेला आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा आंब्याचे भाव आणखी कमी होतील. -रोहीत तिवारी, आंब्याचे घाऊक व्यापारी, जनता बाजार अकोला.
हापूसचा भाव उतरला –
बाजारात देवगड व कोकणातील हापूस सांगून गुजरातच्या हापूस आब्यांचीही विक्री होत आहे. हापूसचे आवक वाढल्याने आगामी काळात दर कमी होतील,अशी माहितीही विक्रेता महेश तायडे यांनी दिली. आंब्याच्या पेटीपेक्षा ग्राहकांकडून एक ते दोन डझन आंब्याच्या खोक्यांना मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.