मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभेच्या ११ जागांसाठी सुमारे ५५ टक्के मतदान झाले. इतर राज्यांचा विचार करता तिसऱ्या टप्प्यात सर्वांत कमी मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली. केवळ महाराष्ट्राचाच विचार करता आधीच्या २ टप्प्यांत ६२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान नोंदले गेले.
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात सर्वांधिक मतदान (सुमारे ६४ टक्के) कोल्हापुरात झाले. बारामतीमध्ये सर्वांत कमी मतदान झाले. सोलापूरही ५० टक्क्यांचा पल्ला गाठू शकले नाही. हातकणंगलेमध्ये ६२ टक्क्यांहून अधिक मतदारांनी हक्क बजावला.
उस्मानाबाद, लातूर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, रायगड, माढा मतदारसंघांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण २५८ उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले.
राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यातील निम्म्या म्हणजे २४ जागांवरील मतदानाची प्रक्रिया ३ टप्प्यांत पूर्ण झाली. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात उर्वरित जागांसाठी मतदान होईल.