पुणे -“शहरात पाचही बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीमुळे मोठी कोंडी होते. ती दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटी रुपये निधीचे उड्डाणपूल हे राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील. त्यासाठी राज्य सरकारने भूसंपादनाची जबाबदारी घ्यावी. तातडीने सामंजस्य करार करावेत. सर्व कामांना तत्काळ सुरुवात होईल,’ असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
शहरातील एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “पुणे-सातारा, हडपसर-यवत, पुणे-शिरूर-नगर, तळेगाव-शिक्रापूर-चाकण आणि नाशिक फाटा ते खेड या मार्गांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार आहे. तसेच पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील. पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले आहेत. त्यातील काही पूर्ण झाले असून, 12 हजार कोटींचे पालखी मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल.’
फडणवीस म्हणाले, “चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून भूसंपादनाला निधी उपलब्ध करून दिला. त्याप्रमाणे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनासाठीही निधी देण्यात आला आहे. पुण्यासाठी नवे विमानतळ गरजेचे आहे. भूसंपादनासाठी लवकरच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्यात येईल.’ अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे चांदणी चौकातील कोंडीची समस्या दूर झाली. पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्याने रस्ते, मेट्रो, विमान वाहतूक अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पुणेअंतर्गत चक्राकार मार्गाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, “एनडीए चौकातील एकात्मिक सुविधा प्रकल्प मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना उपयुक्त ठरण्यासोबत शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास उपयुक्त ठरणार आहे.’ डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “रस्ते बांधणीच्या माध्यमातून देशाची बांधणी होत आहे. विशेषतः दुर्गम भागात विविध सुविधा पोहोचविण्यासाठी रस्ते उपयुक्त ठरतात. अशा रस्त्यांमुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावत आहे. महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे आवश्यक आहे. यावेळी आमदार भीमराव तापकीर यांनीही मनोगत व्यक्त केले. एनएचएआयचे अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक, तर कदम यांनी आभार मानले.
प्रस्तावित प्रकल्प
पुणे-सातारा मार्गावर
दुमजली उड्डाणपूल
(अडीच हजार कोटी रु.)
पुणे-सोलापूर मार्गावर हडपसर-यवतदरम्यान पूल
(पाच हजार कोटी रु.)
पुणे-शिरूर-नगर मार्गावर पूल
(अकरा हजार कोटी रु.)
तळेगाव-शिक्रापूर मार्गावर पूल
(साडेसात हजार कोटी रु.)
नाशिक फाटा-खेड मार्गावर पूल
(नऊ हजार कोटी रु.)
(तसेच शहरालगतचे बायपासचे पूल या कामांचाही समावेश)