गोष्ट आहे जुनी, पण फार फार गुणी. गोष्ट आहे एका राजाची, त्याच्या चांगुलपणाची. राजाचे नाव कृपालदेव राजा. या राजाला शिकारीचे भारी वेड! जंगलाकडे निघाला, की धनुष्यबाण त्याच्यासोबत असेच. एकदा काय झाले? राजा शिकारीला दाट जंगलात निघाला. राजाचे डोळे शिकार शोधू लागले, पण आज राजाला शिकार काही सापडेना. राजाला पाहून जंगलातले प्राणी दडी मारून बसले होते.
कसलाही आवाज, हालचाल न करता शांतपणे बसून होते. त्यांना राजाची भयंकर भीती वाटायची. आज शिकार मिळेना, म्हणून राजा निराश झाला. त्याने घोड्याचा वेग मंद केला. जंगलात कंदमुळे गोळा करणाऱ्या रामप्पा नावाच्या माणसाने हे सारे पाहिले. त्याच वेळी नेमके काय झाले, राज्याच्या गळ्यातील हिऱ्याने मढवलेला सोन्याचा कंठा खाली पडला, पण निराश झालेल्या राजाला हे कळलेच नाही.
तो आपल्याच विचारात पुरता बुडालेला होता. तो चमकणारा सोन्याचा कंठा रामप्पाच्या नजरेस पडला. राजा निघून गेल्यावर रामप्पा कंठाच्या जवळ आला. त्याने तो कंठा उचलला, त्याला क्षणभर वाटले हा कंठा विकला, तर आपल्याला अमाप पैसे मिळतील, पण दुसऱ्याच क्षणी त्याने तो विचार डोक्यातून, मनातून झटकून टाकला. त्याला वाटले, एवढ्या पैशांचे आपण करायचे काय? नको, नको असे करायला नको. ज्याची वस्तू त्याच्याजवळच बरी, भाजीभाकरी खाऊन सुखाने आपण जगतोय हेच चांगले आहे. त्याने तो कंठा धोतरात गुंडाळून ठेवला आणि आपले कंदमुळे गोळा करण्याचे काम तो मन लावून करू लागला.
इकडे आपला कंठा हरवला, हे राजाच्या लक्षात आल्यावर राजाने शिपायांना चारी दिशांना कंठा शोधण्यासाठी पाठवले, पण त्यांना कंठा कुठे सापडेना. सापडेलच कसा? कारण, कंठा होता रामप्पाकडे! त्याने धोतराच्या कनवटीला तो जपून ठेवला होता.
संध्याकाळ झाली ….सारी कंदमुळे विकून रामप्पा राजाकडे आला. कंठा हरवल्यामुळे राजा महालात चिंतातूर होऊन बसला होता. कारण, तो कंठा त्याच्या वडिलांची निशाणी होती. रामप्पाने प्रथम राजाला नमून वंदन केले आणि मग धोतराच्या कनवटीला गुंडाळून ठेवलेला कंठा राजासमोर धरला. कंठा पाहून राजाला अत्यानंद झाला. तो कंठा हातात घेऊन राजाने छातीशी लावला आणि म्हणाला, “हा कंठा माझ्या वडिलांनी त्यांच्या गळ्यातून काढून माझ्या गळ्यात घातला होता. आता ते हयात नाहीत, पण त्यांची ही निशाणी मी नेहमी गळ्यात घालून माझ्या हृदयाजवळ ठेवतो. तू लाखमोलाहून अधिक मोठा असा माझा ऐवज आज मला आणून दिलास, मी तुझ्यावर बेहद्द खूश आहे. माग, माग, तुला काय हवं ते माग!’
रामप्पा शांतपणे म्हणाला, “राजा, मला काहीही नको. ज्याची वस्तू त्याच्याजवळ गेली, याचाच मोठा आनंद आहे मला! बराच अंधार झालाय, येतो मी आता.’ राजा म्हणाला, “नाही, तू आता घरी जायचं नाहीस. माझ्याच महालात राहायचंस तू!’
रामप्पा म्हणाला, “राजा, मला क्षमा कर, पण मी महालात येणार नाही. राजा म्हणाला, “पण का? तिथं काय कमी आहे?’
रामप्पा म्हणाला, “राजा, दिवसभर जंगलात रानोमाळ भटकून, सरपणफाटा गोळा करून हा जीव थकतो. कष्टाची मिरचीभाकरच आम्हाला गोड लागते. जंगलातलं थंडगार पाणी पिऊनच आमची खरी तहान भागते आणि थकल्याभागल्या या जीवाला सुखाची झोप इथंच जमिनीवर लागते. अशावेळी आकाशातले चंद्र-तारेही आमच्या सोबतीला असतात, म्हणून राजा मला इथंच राहू दे. या कष्टाच्या जीवाला आळसाची सवय नको लावूस.’ एका दमात रामप्पाने सारे राजाला सांगून टाकले अन् राजा जंगलातल्या त्या अडाण्या रामप्पाचे विचार ऐकून थक्क झाला. विचारात पडला लोकांना कष्ट नको आराम हवा. घाम न गाळता दाम हवा. अशा परिस्थितीत रामप्पा राजाला वेगळा वाटला.
रामप्पा पुढे म्हणाला, “राजा, तुला जर मला काही द्यायचंच असेल, तर एक वचन देशील? बघ लहान तोंडी मोठा घास होईल, पण जे मला मनापासून वाटतंय तेच तुझ्याशी बोलायचंय. खूप दिवसांपासून माझ्या मनात आहे, फक्त आज तुझी परवानगी असेल, तर ते ओठावर येईल.’
राजा म्हणाला, “कसले वचन? माग, काय हवं ते! आज मी तुझ्यावर खूप खूश आहे.’ रामप्पा सारा धीर गोळा करत म्हणाला, “राजा तू या जंगलात येऊ नकोस, शिकार करू नकोस. शिकारीचा नाद सोडून देण्याचे वचन आज देशील मला? राजा, या जंगलातले सारे प्राणी माझ्या मुलाबाळांप्रमाणेच आहेत. ते आहेत म्हणून तर हे जंगल आहे, या जंगलाला शोभा आहे. पण तुझ्या शिकारीमुळे जंगल उद्ध्वस्त होतंय. राजा, तुझा खेळ होतो, पण या मुक्या प्राण्यांचा जीव जातो. तुझ्या शिकारीच्या बाणाने घायाळ झालेले प्राणी पाहून माझा जीव तडफडतो.’
रामप्पा व्याकूळ होऊन सारे सांगत होता आणि राजा अधीर होऊन सारे ऐकत होता. राजाने आपल्या पाठीवर असलेले धनुष्य हातात घेतले आणि मांडीवर वाकवून एका क्षणात ते तोडून टाकले. एकेकाळी राजाला घाबरणारे प्राणी आता मात्र राजाशी मनमुराद खेळतात.
एकनाथ आव्हाड