जाणीव, जाण, संवेदना, सहवेदना हे जवळपास समान अर्थ असणारे शब्द. खरंतर सारख्या जाणिवा जोपासणारे, पण या काळ-काम-वेगाची गणिते सोडवतानाच आपली इतकी दमछाक होते की, या जाणिवांची फुलपाखरं कधी जन्मतात आणि कधी लोप पावतात तेच कळत नाही.
कॉलेजमधे असताना रोज बसने जायची. रोज आम्हा 5-6 मैत्रिणींचा घोळका कॉलेजच्या स्टॉपवर उतरत असू. त्या स्टॉपवर एक आजी रोज दिसायच्या. त्यांची बसण्याची जागाही ठरलेली होती. आम्ही बसमधून उतरलो की नेमक्या त्या माझ्याजवळ यायच्या आणि माझ्यासमोर हात पसरून उभ्या रहायच्या. मीही विचार न करता हातातली चिल्लर नाणी त्यांच्या हातावर टेकवून रिकामी व्हायचे. एक दिवस अशाच त्या माझ्याकडे आल्या; पण त्या दिवशी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते.
मी त्यांना तसे सांगितल्यावर क्षणभर त्या बावरल्या. न जाणे किती भावनांच्या छटा त्या क्षणभरात त्यांच्या डोळ्यांत तरळून गेल्या. मग त्या सावकाश वळल्या आणि गर्दीत दिसेनाशा झाल्या. तो दिवस आणि आजचा दिवस. कुठेतरी त्यांना पैसे देऊ शकले नाही ही जाणीव सलत राहिली. जेव्हा जेव्हा मी मनाचे कप्पे उघडते तेव्हा तेव्हा अशा अनेक घटनांच्या घडी उलगडत जातात. जाणिवांची शुभ्र पांढरी पिसे तरंगू लागतात.
आपल्यातलेच काहीजण वेगळं काहीतरी करण्याची धडपड करताना आपण मात्र आपल्या झापडांनी दाखवलेल्या रस्त्यावर कोलूचे बैल बनून सुखेनैव चालत राहातो. होतेही कधीतरी आपल्याला वास्तवाची जाणीव. आपल्यातलीही ठिणगी पेटते कधीतरी, पण बहुधा ती मल्टिप्लेक्सच्या एसीमधे विझून जाते किंवा आपण स्वीकारलेल्या लाइफस्टाइलच्या अंधानुकरणात मिटून जाते. एखादा सैनिक सीमेवर चकमकीत शहीद होतो तेव्हा त्याचे ते समर्पण एकतर आपण नजरेआड करतो किंवा अगदी उत्सवी वातावरणात त्याला निरोप देतो. या खरंतर दोन टोकाच्या जाणिवा आहेत. या दोन्हीतला सुवर्णमध्य काढायच्या भानगडीत आपण सहसा पडतच नाही.
काय आहे हे? जे सैनिकांच्या बाबतीत तेच आपले स्वातंत्र्यसेनानी किंवा ज्येष्ठांच्या बाबतीत. समाजात घडणाऱ्या दुर्घटना, वाईट गोष्टी यांची झळ आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला बसू नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण तीच घटना किंवा एखादी दुर्दैवी गोष्ट शेजारच्या कुटुंबात घडली तर बऱ्याचदा आपले नुकसान नाही झाले ना? मग आपल्याला काय करायचेय असा विचार आपण करतो. आपल्या संवेदना, जाणिवा मरत चालल्यात का? खून, बलात्कार, मानसिक-लैंगिक शोषण या गोष्टी बंद व्हाव्यात, त्यांना काही प्रमाणात आळा बसावा यासाठी आपण आपले काही योगदान देऊ शकतो का? किंवा आपण काही करू शकतो का? याचा विचार न करता आपण कासवाची भूमिका घेतो.
आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चर्चा करणारे आपण अन्न टाकून देण्यात आघाडीवर आहोत. त्या उन्हातान्हात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ते अन्न टाकून देताना आपल्याला का होत नाही? आपण मोठमोठी संकुले, उंच उंच इमारतींमधे राहातो, पण त्या इमारती बांधणाऱ्या मजुरांच्या मोडक्यातोडक्या झोपड्या मात्र अंधारलेल्याच राहतात. आज शहरातल्या खोट्या झगमगीच्या आकर्षणापायी हजारो लोक शहरांकडे स्थलांतरित होतात. यात आंतरराष्ट्रीय घुसखोरी होतानाही आपण पाहतो.
हे विश्व एक ग्लोबल खेडे आहे ही कन्सेप्ट आकाराला येत असतानाच दुसरीकडे हजारो बांगलादेशीय नागरिक त्यांच्या देशातील मूलभूत सुविधांच्या अभावाने आपल्या देशात घुसखोरी करतात. आपल्या ग्रामीण भागातले तरुण, “काय ठेवलंय गावाकडं?’ असा सवाल करत शहरात वसण्याचं स्वप्न बघतात.आपल्या आधीच्या लोकांनी आपल्या संस्कृतीचा मूळ स्वभाव किंवा पाया ओळखून खेडी स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला होता. आज त्याचा पार बोऱ्या वाजलाय. या आणि अशा अनेक गोष्टींच्या वैचारिक घुसळणीत पिचत चाललेले आपण सर्वसामान्य लोक नकळत आपल्या जाणिवा, आपल्या संवेदना नष्ट करत चाललोय.
खरंतर जाणीव ही खूप अलवार गोष्ट आहे. जाणिवेमुळे इतर प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा झाला आहे. पण दुर्दैवाने आज माणसाने स्वतःच ही जाणिवांची कवाडे बंद करायला सुरुवात केलीय. भूतदया, माणुसकी, सामाजिक बांधीलकी या गोष्टी आउटडेटेड व्हायला लागल्यात. माणसाने फक्त स्वतःपुरत्या वर्तुळात स्वतःला बंद करून घेतलेय. स्वतःचे माणूसपणही त्याला नकोसे वाटतेय. चंद्रावर, मंगळावर जायची भाषा करताना आपली पायाखालची जमीन सुटत चाललीय याचेही भान तो विसरलाय. अति सुखासीनता आणि स्वकेंद्रितता यात अडकलेल्या माणसाने जर स्वतःच्या जाणिवा जिवंत ठेवल्या नाहीत, तर एकवेळ आपली पुढची पिढीच आपल्याला संवेदनाहीन म्हणून वागवेल. म्हणून देर आये दुरुस्त आये, असे म्हणत पुन्हा जागवूया आपल्या जाणिवा आणि जगूया थोडसं दुसऱ्यासाठीही कधीतरी. हे जाणिवांचे जग खरंच सुंदर आहे आणि जाणिवांची अंतरे ही…
– मानसी चिटणीस