नगर -करोना विषाणूचा प्रसार होण्यास प्रमुख धोका असल्याच्या कारणात्सव सलूनचालकांचे व्यवसाय बंद आहेत. रोजगाराचे एकमेव साधन तीन महिन्यांपासून बंद असल्याने सलून व्यावसायिक स्वत:च्या कुटुंबाची गुजराण करू शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात साधारणतः 20 लाख कारागीर सलून व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यातील बहुतेकजणांची आता जगण्याची लढाई सुरू झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांपाठोपाठ आता सलूनचालकांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
नगरमध्ये साडेसातशे व नगर जिल्ह्यात
अकरा हजार सलूनचालक आहेत. त्यातील अनेक सलून चालकांनी भाडेतत्त्वावर गाळे घेतलेले आहेत. मागील दोन महिन्यांत व्यवसाय बंद झाल्याने भाडेतत्त्वावरील सलून चालक भाडे देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे एकट्या नगर शहरातील तब्बल 30 सलून चालकांना गाळ्याच्या मालकांनी अक्षरश: गाळ्यातून हकलून दिले आहे. त्यासाठी सलून चालकांची अक्षरश: मानहानी देखील करण्यात आली. आधीच व्यवसाय बंद असल्याचे जगण्याची भ्रांत असलेले सलून चालक भाडे कसे देणार, असा प्रश्न आहे.
तथापि, याकडे सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याची भावना नगरमधील नाभिक समाज महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, यासाठी नाभिक समाज महामंडळाच्या नगर शाखेतर्फे 8 जूनला आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मागील गुरुवारी (दि.11) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलकांच्या मागण्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काहीच होत नसल्याने नाईलाजास्तव उद्यापासून (दि.18) नाभिक समाज रस्त्यावर उतरुन राज्यव्यापी जेलभरो आंदोलनाच्या तयारीत आहे.
नाभिक समाजाची अवस्था कठिणच…!
करोनाचा प्रसार आमच्याकडून होईल, अशी भीती दाखवून आमचे व्यवसाय बंद ठेवले आहेत. म्हणजे आम्ही जगायचे नाही, असाच त्याचा अर्थ आहे. काल चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जानगर येथे स्वप्नील चौधरी या अवघ्या 27 वर्षे वयाच्या सलून चालकाने आत्महत्या केली. तीन महिने व्यवसाय बंद असल्याने तो अर्थिक संकटात होता. अशीच परिस्थिती अन्य सलून चालकांची देखील आहे. ते आणखी किती दिवस तग धरतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांप्रमाणेच नाभिक समाजाच्या आत्महत्या वाढल्यास सरकार केवळ दु:ख व्यक्त करेल, याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया नाभिक विकास महामंडळाचे प्रदेश सरचिटणीस विकास मदने यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.
गाळ्याचे भाडे महिन्याला पाच हजार रुपये होते. गेली तीन महिने व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे गाळ्याचे भाडे देऊ शकलो नाही. गाळामालकाने तीन महिन्यांचे पंधरा हजार रुपये मागितले. मला काही काळाची संधी द्या, अशी मी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती त्यांना केली. मात्र, त्यांनी गाळाभाडे दे किंवा गाळा खाली कर, असे दोनच पर्याय माझ्यासमोर ठेवले. अखेरीस काळजावर दगड ठेवून मी गाळा सोडला. आता घरात बसून आहे. जगायचे कसे? अशी चिंता मला सतावते आहे.
प्रणीत शिंदे सलून चालक, केडगाव, अहमदनगर