पारनेर -तालुक्यातील कोहकडी येथील तरुणाला बिबट्याने पळवून नेले असल्याचा बनाव उघड झाला असून हा तरुण त्याच्या मित्राच्या सहाय्याने पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पारनेर पोलिसांनी आळेफाटा येथून ताब्यात घेतले आहे. तो कोणत्या उद्देशाने हा बनव करून पळून गेला होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील सतीश सुखदेव गायकवाड (वय 27) हा तरुण घराकडे येत असताना त्याला वाघाने किंवा बिबट्याने खाल्ले आहे, जंगलामध्ये त्याची मोटरसायकल, एकाच पायातील बूट, मोबाईल या वस्तू पडलेल्या आहेत, त्याठिकाणी बिबट्याच्या पायाच्या खुणा आहेत असा फोन आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनादेखील बोलवण्यात आले. यानंतर रात्री
आठ ते दहा तास ग्रामस्थांच्या मदतीने सतिश गायकवाड यांचा जंगलामध्ये, उसाच्या शेतामध्ये शोध घेतला. त्यानंतर नगर येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो आढळून आला नाही. दरम्यान पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपवनसंरक्षक अधिकारी आदर्श रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
यानंतर सतिश गायकवाडबाबत दुसरीच कुठलीतरी घटना घडल्याचा संशय बळावल्याने समांतर तपासाला सुरुवात झाली. त्यादरम्यान त्याचा भाऊ संदीप सुखदेव गायकवाड यांनी भावास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून करण्याच्या उद्देशाने पळून नेले आहे, अशी फिर्याद पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार बोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांच्या अथक प्रयत्नांनी सतीश गायकवाड यास कोणी तरी पळून गेले नसून तो त्याच्या मित्राच्या सहाय्याने पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. पारनेर पोलीस स्टेशनच्या या पथकाने गायकवाड यास आळेफाटा या ठिकाणी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचा मित्र निखिल भानुदास गागरे (रा. ताहाराबाद ता. राहुरी, जि. अहमदनगर) यास निघोज येथून गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले आहे.