आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निर्णयानंतर विद्यार्थी संतप्त
पुणे – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जुलै महिन्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा घेताना प्रत्येक विद्यार्थ्याचा 5 लाख रुपयांचा विमा काढावा, अशी विनंती राज्य सरकारला केली. यावरून विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तर, महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) विद्यार्थ्यांच्या जीवाचे मोल फक्त 5 लाख रुपये आहे का? असा प्रश्न विद्यापीठाला केला आहे.
करोनाची परिस्थिती गंभीर होत असताना परीक्षेचा पुनर्विचार करा, अशी मागणी संघटनेने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक अगोदरच जाहीर केले असून त्यानुसार परीक्षा 16 ते 22 जुलैदरम्यान होत आहे. या परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा 5 लाखांचा विमा काढण्यात यावा यासाठी शासनाला मार्गदर्शन करण्याची विनंती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केली आहे.
परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, हे माहीत आहे तर मग परीक्षा घेण्याचा इतका अट्टहास का? वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावर का शांत बसले आहेत, असा प्रश्नही “मासू’चे सिद्धार्थ तेजाळे यांनी केला आहे.