प्रशांत जाधव
जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात सोने पॉलिशच्या नावाखाली लुटीचे प्रकार वाढले असून या माध्यमातून लाखो रूपयांचे सोने लुटीला गेल्याचे पोलीस दप्तरावरून दिसून येत आहे. यामध्ये खास करून परप्रांतीय युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या युवकांचा बहाणा सोने पॉलिशचा असला तरी धंदा लुटीचाच असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगत अशा लोकांची माहिती तातडीने पोलिसांना देणे गरजेचे बनले आहे. नागरिकांनी आमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता अशा भामट्यांचे डाव उधळून लावल्यास या घटनांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अन् सोन्याची झळाळी महागात पडणार नाही.
अशी होते फसवणूक
सोने पॉलिश करण्यासाठी आलेला भामटा त्याच्याकडील भांड्यात आपल्याकडील सोने टाकतो. त्यानंतर त्या भांड्यात तो त्याच्याकडील पॉलिशची पावडर व पाणी टाकून आपल्याला घरातून हळद अथवा काहीतरी वस्तू आणायला सांगतो. दरम्यान त्या पाण्याचा पूर्ण रंग बदलून गेल्याने भांड्यातील काही आपल्याला दिसत नाही. नेमका याच संधीचा फायद घेत हे भामटे गरम पाणी करण्यास संबंधित महिलेला सांगतात. पाणी गरम करण्यासाठी लागणाऱ्या वेळात भांड्यातील दागिने काढून भामटा त्याच्याकडे ठेवतो. त्यानंतर गरम पाणी त्या भांड्यात ओतण्यास सांगून 30 मिनीटांनी दागिने बाहेर काढा असे सांगून भामटे पलायन करतात.
माहितीच्या सोनाराकडूनच पॉलिश करावे
मुळात रोजच्या वापरात असलेले सोनेच दीर्घकाळ वापरल्यानंतर पॉलिश करण्यासाठी देणे अपेक्षित आहे. हे करताना आपल्या नेहमीच्या माहितीतील सोनाराकडेच ते दागिने द्यावेत, दागिने सोनाराकडे देताना त्याचे वजन करून पाहावे. पॉलिश झाल्यानंतरही दागिने स्वीकारताना परत वजन करून दागिन्याची खात्री करूनच बाहेर पडावे.
विनोद पवार,गोकुळदाजी सराफ, वडूज.
माहितीच्या सोनाराकडूनच पॉलिश करावे
मुळात रोजच्या वापरात असलेले सोनेच दीर्घकाळ वापरल्यानंतर पॉलिश करण्यासाठी देणे अपेक्षित आहे. हे करताना आपल्या नेहमीच्या माहितीतील सोनाराकडेच ते दागिने द्यावेत, दागिने सोनाराकडे देताना त्याचे वजन करून पाहावे. पॉलिश झाल्यानंतरही दागिने स्वीकारताना परत वजन करून दागिन्याची खात्री करूनच बाहेर पडावे.
विनोद पवार,गोकुळदाजी सराफ, वडूज.
अशा लोकांची माहिती पोलिसांना द्या
आपल्या गावात येणाऱ्या अनोळखी लोकांच्या प्रत्येक हालचालीवर स्थानिकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. गावात शंकास्पद वावर असलेले लोक अथवा अशा पद्धतीने पॉलिश करून देतो सांगणारे लोक दिसल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यास त्यांना पकडण्यात यश येईल.
(विश्वजीत घोडके,पोलीस निरीक्षक, सातारा तालुका)