3 मे च्या लॉकडाऊन विषयी मात्र संदिग्धता कायम
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सध्याच्या करोना उपाययोजना आणि लॉकडाऊन संबंधात चर्चा केली. देशाला करोना नियंत्रणाबरोबरच अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. देशातील सध्याचे करोना संकट लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवावा लागेल अशी सूचना अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तथापि, त्यावर पंतप्रधानांनी यावेळी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे लॉकडाऊन विषयीची संदिग्धता कायम राहिली आहे.
राज्यांनी आपल्या हद्दीतील करोना हॉटस्पॉटमध्ये करोनासंबंधीचे निर्बंध कडकपणे अंमलात आणावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. देशात पाळल्या गेलेल्या लॉकडाऊनचे चांगले निष्कर्ष निघाले असून त्यामुळेच करोना नियंत्रणात राहिला आहे असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान म्हणाले की, देशाने दोन लॉकडाऊन अनुभवले आहेत. आता आपल्याला यापुढचा विचार करावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते यापुढील काही महिन्यांमध्येही करोनाचे संकट कायम राहणार आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. आता यापुढे चेहरा झाकून घेणे आणि मास्क लावणे हे आपल्या आयुष्याचा भागच होणार आहे.
आजच्या या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच अनेक मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले.
उपस्थितांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश होता.