मुंबई – 2019 च्या निवडणुकीनंतर झालेल्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही होते. आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एका मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, ‘सरकार स्थापनेला शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपावण्यात आल्या होत्या. मात्र शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. उद्धव ठाकरे यांनी आधीच आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले होते,” असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, “आमचा शपथविधी होण्याच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. असं आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपांना आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. नुकतंच शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली? विकेट दिली तर सोडली कशी विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का? माझा पाठींबा होता तर दोन दिवसात सरकार कस गेलं. देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी काहीकाही करू शकतात’. असं शरद पवार यावेळी म्हणाले.