पुणे – राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. शहरातील कोयता गॅंग, दौंडमधली गुन्हेगारी, खून, महिलांवर अत्याचार हे सातत्याने होत आहे. राज्यात असे प्रकरा वाढणे, हे गृहविभागाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महागाई आणि बेरोजगारीवर ठोस पावले उचलली पाहिजेत. कारण सरकारचे हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले. त्यानंतर खासदार सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्या योजना केंद्र सरकारच्या आहेत त्या राज्यात राबवल्या जात नाहीत. बारामती मतदारसंघात या योजना राबवत आहे. अजित पवार पालकमंत्री असताना दर शनिवारी लोकांना भेटत होते. प्रत्येकाचे काम ते करत असत. आपल्या जिल्हयात 1 लाखांच्यावर लाभार्थी आहेत.
साहित्य पाठवण्याची मागणीही केंद्राकडे केली आहे. यात राजकारण नको. तुम्ही म्हणाल तो फोटो लावू. पण साहित्य द्या, असे सुळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांची सभा होतेय तर चांगले आहे. संविधानाने सर्वांनाच सभा घेण्याचा अधिकार दिला आहे.
कायदे फक्त विरोधकांसाठीच
कसबा पोटनिवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेचा भंग झाल्याबाबत विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या की, मला आश्चर्य वाटत नाही. कारण हे सरकार नियमाने चालत नाही. कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पक्ष करणार आहे.