कोपरगाव – कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांचा दुष्काळी यादीत सामावेश होतो. मात्र कोपरगाव तालुक्याला वगळले जाते. त्यामुळे कोपरगावची जनता दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिली. हजारो क्यूसेकने जायकवाडीमध्ये पाणी वाहून गेले. गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र विकत पाणी घेत आहेत. यासर्व गोष्टींना तालुक्याच्या आमदार कारणीभूत असून, त्यांच्या उदासीनतेमुळेच तालुका भकास झाल्याचे टीकास्त्र कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर नाव न घेता सोडले.
तालुक्यातील सोनेवाडी, पोहेगाव, रांजणगाव देशमुख, देर्डे चांदवड, देर्डे कोऱ्हाळे आदी ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन काळे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मागील पाच वर्षांपासून गोदावरी कालव्याच्या आवर्तनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. 2014 पर्यंत तालुक्यात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबईला होत आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. सांगितलेले आवर्तन दिले जात नाही. शेतीसाठी अडीच किलोमीटरपर्यंतच पाणी देण्याचा निकष नसतांनादेखील अडीच किलोमीटर पर्यंतच तर काही ठिकाणी अडीच किलोमीटरच्या आतच शेतीसाठी पाणी देण्यात आले. त्याबाबत तालुक्याच्या आमदारांनी चकार शब्द काढला नाही. अशा अकार्यक्षम आमदारांना तालुक्याची जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना घरी बसविल्याशिवाय जनता राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती सभापती अनसूयाताई होन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, काकासाहेब जावळे, जि. प. सदस्या सोनाली रोहमारे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, देर्डे कोऱ्हाळे सरपंच योगीराज देशमुख, देर्डे चांदवड सरपंच ज्योती बर्डे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, रांजणगाव देशमुख सरपंच संदीप रणधीर तसेच ग्रामस्थ व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.