संगमनेर -लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने स्वयंसेवकांमार्फत फोनवरून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मागवलेला किराणा व भाजीपाला यासह मूलभूत वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली.
याबाबत बोलताना तांबे म्हणाल्या, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने नागरिकांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त काळजी घेतली आहे. यासाठी सातत्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी फवारणी केली आहे. सॅनीटायझर व साबणाचे वाटपही केले आहे. करोना संसर्गाच्या बाबतीत जागोजागी विविध फलक लावले आहेत.
यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी व विविध सेवाभावी संस्था व शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत. प्रादुर्भाव काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांना घरातच किराणा व भाजीपाला यासह मास्क, सॅनीटायझर, औषधे इत्यादी महत्त्वाच्या वस्तू तातडीने मिळण्याकरता नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी, सेवाभावी संस्था यांना फोनवर संपर्क केल्यास आपल्याला घरहोच होतील, असे तांबे यांनी सांगितले.