कोपरगाव – करोनाच्या प्रादुर्भावाने संपुर्ण जग हादरले आहे. हजारो नागरीकांचा मृत्यु होतोय. राज्यात संचारबंदी लागू केली असतांनाही जनतेला त्यांच्या जीवाचा धोका लक्षात आला नाही. किंवा धोका समजून सुध्दा नागरीक खुले आम रस्त्यावर फिरत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून विनाकारण गर्दी केली जात आहे.
चारदिवस घरात बसलेल्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत फिरण्यास सुरूवात करुन स्वतःसह कुटूंबाचा धोका वाढवित आहेत. काही दिवसांपासुन शहरातील मुख्य रस्ते, रहदारी विना ओस पडले होते. पण शुक्रवारी सकाळपासुन कोपरगाव शहरातील रस्ते पुन्हा गजबजू लागले. प्रशासनाचे अधिकारी, पोलिसांनी नागरीकांच्या या विकृतीपुढे हात टेकले. नागरीकांना करोनाची भिती व गांभीर्य नसल्याने असा प्रकार पुढे येत आहे. जर करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर याला जबाबदार नागरीक असणार हे नक्की आहे, अशी खंत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अखेर पोलीस अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांनी कोपरगावच्या काही बेजबाबदार नागरीकांना सांगण्याऐवजी स्वतःच्या कार्यशैलीत बदल करीत कार्यालयीन कामात लक्ष केंद्रित केले आहे. नागरीकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट काढून रस्ता मोकळा करत गर्दी केली. पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी केली.दुध, भाजीपाला, किराणा, औषधे, दवाखाना, शेती संबधीत खते औषधे खरेदीसाठी झुंबड उडवली.
गर्दी करु नये, म्हणून पालिकेचे कर्मचारी नागरीकांना दुकानासमोर गोल रिंगण मारून अंतराने उभे राहून खरेदी करावी, असे प्रबोधन करीत आहेत. पण शिस्तीपेक्षा करोनाची मस्ती बरी असाचा काही प्रकार सुरू असल्याने कोपरगावचे रस्ते पुन्हा गजबजले. व्यापारी, भाजी फळे विक्रेते कुठेही बसु लागले, विनाकारण मोटारसायकली, चारचाकी गाड्यांची वर्दळ वाढली आहे.
आवाक्यात येणारा करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती प्रशासनाच्या वतीने व्यक्त केली जात आहे.
नागरीकांच्या हातात आहे. या महामारीपासुन सुरक्षित राहायचे कि नाही. जर सर्वांनी काही दिवस घरात बसले तर भविष्यात येणारा हा धोका टळू शकतो. अन्यथा काहीही होवू शकते अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे.