मुंबई- मुंबईत सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने मुंबईतील काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. या पार्श्वभूमीवर धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
मुंबईवरील मोठे संकट रोखण्यासाठी धारावीत कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.धारावीतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची लेखी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच, मुंबईला करोनाच्या मोठया संकटापासून वाचविण्यासाठी धारावीमध्ये आणखी काही कठोर उपाययोजना करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे. धारावीतील प्रादुर्भाव वेळीच रोखला गेला नाही तर या परिसरावर आणि पर्यायाने मुंबईवर मोठे संकट येईल, असा इशाराही खासदारांनी दिला आहे.
दाट लोकसंख्येमुळे धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या संकटापासून धारावीला आणि पर्यायाने मुंबईला वाचविण्यासाठी राज्य सरकारने धारावीला पूर्णतः लॉकडाउन करण्यासोबतच मुंबई महानगरपालिकेने इथली सर्व रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोना बाधितांसाठी राखीव करावीत. ‘धारावी स्पोर्टस कॉम्प्लेक्स’ चा वापर क्वारंटाईन वॉर्ड म्हणून करावा. संपूर्ण धारावीचे निर्जंतुकीकरण त्वरित करावे आणि इथल्या सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करावी.
लॉकडाऊन काळात अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून स्वतंत्र शिधावाटप व्यवस्था आणि एक स्वतंत्र होम किचन सुरु करावे. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाला धारावीत तैनात करण्यात यावे, अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.