Amit Shah | Mamata Banerjee | Lok Sabha Election 2024 – पश्चिम बंगालच्या वर्धमान येथील प्रचारसभेत भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा यांनी तृणमूल कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले ममता दीदी येथे पंधरा दिवसांपासून प्रचार करत आहेत.
दुर्गापूर येथून भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याचा त्यामागे उद्देश आहे. मात्र त्यांनी येथे पाच वर्षे जरी तृणमूलचा प्रचार केला तरी त्या दुर्गापूरमधून भाजपला हरवू शकत नाहीत असे आव्हान शहा यांनी ममतांना दिले.
ते म्हणाले की बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि हिंसाचार आता सामान्य बाबी झाल्या आहेत. आजच एक बॉम्बस्फोट झाला. त्या (ममता) आम्हाला घाबरवू पाहत आहेत.
मात्र दुर्गापूरवाल्यांनी लक्षात घ्यावे की निवडणूक आयोगाने येथे केंद्रीय दल तैनात केले आहे व त्यामुळे तृणमूलच्या गुंडांना घाबरण्याचे काही कारण नाही. सगळ्यांनी मतदान करावे. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणणे असा आहे.
कॉंग्रेसने ७० वर्षांपासून राम मंदिर रोखून धरले होते. पंतप्रधान मोदींनी पाच वर्षांत मंदिर बांधले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ममता आणि त्यांच्या भाच्याला आमंत्रण देण्यात आले होते.
मात्र ते आले नाहीत. का आले नाहीत? त्यांना त्यांची मतपेढी सुरक्षित ठेवायची होती. त्यांना त्यांच्या मतपेढीची भिती वाटते. जे घुसखोरी करून आले आहेत ती त्यांची वोट बँक आहे. ती ममतांना घाबरवते.
ममता दीदी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचा अर्थात सीएएचा विरोध करत आहेत. त्यांच्या भाच्याचे गुंड गौ तस्करीचे काम करत आहेत. इकडे गृहमंत्र्यांनी ममतांवर टीका केली की तिकडे गुंड पैसे गोळा करून भाच्याला देतात.
इंडिया आघाडीवाले केवळ घोटाळे करतात. दीदींच्या मंत्र्याच्या घरात ५० कोटी कॅश सापडली. झारखंडमध्येही काल रात्रीच एका मंत्र्याच्या घरात ३० कोटी रोख रक्कम सापडली असे शहा यांनी सांगितले.