पाटणा – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये उद्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. अररिया, मधेपुरा, सुपौल आणि खगडिया व झंझारपूर या जागांवर मतदार उद्या त्यांचा कौल देतील. रविवारी सायंकाळी पाच वाजता तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त झाला. मात्र बिहारमध्ये पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही मतदारांची शांतता अथवा मौन कायम असल्यामुळे तो राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
झंझारपुर: संयुक्त जनता दलाचे उमेदवार रामप्रीत मंडल यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत येथून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार गुलाब यादव यांना सव्वातीन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले होते. आताही आपणच विजयी होणार असा मंडल यांना विश्वास आहे. इंडिया आघाडीने ही जागा मुकेश साहनी यांच्यासाठी सोडली आहे. त्यांच्या व्हीआयपी पक्षाचे सुमन कुमार महाशेठ येथून उमेदवार आहेत. तर गुलाब यादव यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे इंडिया आघाडीचा उमेदवार धोक्यात आला आहे. यादव हे माजी आमदार आहेत. त्यांच्या पत्नी विधान परिषदेच्या सदस्या आहेत तर मुलगी जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे यादव यांनी स्वबळावर रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे व जी संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराला मतांच्या विभागणीमुळे फायद्याची ठरू शकते.
मधेपुरा: संयुक्त जनता दलाचे उमेदवार दिनेश यादव यांनी गेल्या निवडणुकीत शरद यादव यांचा पराभव केला होता. यावेळी दिनेश यादव यांचा सामना राष्ट्रीय जनता दलाचे कुमार चंद्रदीप यांच्याशी आहे. हा समाजवादी विचारांचा बालेकिल्ला मानला जातो. रोम पोप का, मधेपुरा गोप का असा येथे नारा प्रसिध्द आहे. अशात यादव मतपेढीवर ज्याची पकड घट्ट त्याचा येथे विजय होतो. एकप्रकारे राजदचे लालू यादव यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
अररिया: आपल्या परंपरागत मतदारांच्या पाठबळावर राष्ट्रीय जनता दलाचे शाहनवाज आलम येथे विजयाचे स्वप्न पाहत आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार प्रदीप सिंह यांना आपली जागा राखण्याचे आव्हान आहे. २०१९ मध्ये येथून भाजपचाच विजय झाला आहे.
सुपौल: या मतदार संघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. संयुक्त जनता दलाचे खासदार दिलेश्वर कामत यांच्यासमोर आपली जागा राखण्याचे आव्हान आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे चंद्राहास चौपाल त्यांना कडवी लढत देताना दिसत आहेत. अपण म्हणून रिंगणात उतरलेल्या वैद्यनाथ मेहता यांनी सगळ्यांची चिंता वाढवली आहे. सुपौलच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे निवडणूक जातीच्या समीकरणाच्या अनुशंगाने फिरताना दिसते.
खगडिया: चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे उमेदवार राजेश वर्मा यांच्यासमोर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अर्थात एनडीएचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संजय कुशवाह यांचे त्यांना आव्हान असणार आहे. येथे बाहेरचा उमेदवार आणि स्थानिक उमेदवार असे वातावरण निर्माण केले गेले आहे.
लोकांच्या म्हणण्यानुसार राजेश वर्मा बाहेरचे तर संजय कुशवाह स्थानिक आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत लोजपचे मेहबुब अलि कैसर यांनी अडीच लाख मतांनी विजय मिळवला होता. यावेळी समीकरण बदलले असून दोन्ही बाजूंनी नवा चेहरा देण्यात आला आहे. लोजपचे तिकिट न मिळाल्याने कैसर यांनी राष्ट्रीय जनता दलाचा हात पकडला आहे. संयुक्त जनता दलाच्या माजी खासदार रेणु कुशवाह यांनीही राजदमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मतदार कोणावर विश्वास टाकतात ते आता बघावे लागणार आहे.