नवी दिल्ली – भारतात करोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेवर कमालीचा ताण आला असताना अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत राहण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना किती पसरतो यावरच याबाबतचा निर्णय अवलंबून असेल.
उद्योग व्यावसायिक आणि मजूर वर्ग यांना नजरेसमोर ठेवून 11 ते 14 एप्रिलच्या दरम्यान हे पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता या विषयाशी निकटचा संबंध असणाऱ्या सूत्रांनी व्यक्त केली. सरकारने वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळ्या उपाय योजना आखल्या आहेत. मात्र लॉक डाऊन संपल्यानंतर किंवा संपत असताना त्याचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लॉकडाऊन उठवल्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे संकेत या सूत्रांनी दिले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे गरीब आणि स्थलांतरीतांच्या मदतीसाठी एक लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यावेळी त्यांनी या काळात कोणीही उपाशी पोटी झोपणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वस्त केले होते. पुढील तीन महिने गरजवंताच्या हातात पैसे राहतील, अशी सरकारची योजना आहे. करोना साथीमुळे लादलेल्या निर्बंधामुळे गरीबांचे हाल होऊ नयेत, हा त्यामागचा उद्देश आहे.
सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व उद्योग-व्यवसाय बंद आहेत. लोकांनी शक्य तो घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. मॉल्स, जीम, बागा अशा सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टी विकणारी दुकानेही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे आणि विमानातून होणारी प्रवासी सेवा थांबवण्यात आली आहे.