3 महिन्यांत तब्बल 14 खून; येरवडा आणि हडपसर हद्द “हॉटस्पॉट’
– संजय कडू
पुणे – शहरात लॉकडाऊनमध्ये वाटमारीचे गुन्हे घटले, मात्र दुसरीकडे खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा आलेख चढताच राहिला. शहरात मार्च, एप्रिल आणि मे तीन महिन्यांत जवळपास 14 खून आणि 19 खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या. या घटना प्रामुख्याने येरवडा आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. एकट्या मेमध्ये दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल चार ते पाच खुनाच्या घटना घडल्या आहेत.
येरवडा पोलीस ठाण्यावर कोणाची मेहरनजर?
येरवडा आणि हडपसर गुन्हेगारीचे केंद्र बनत असताना तेथील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक होते. त्यातही येरवडा पोलीस ठाण्याला पंखाखाली घेण्यात आले. तर, हडपसर हद्दीत थोडेसेही खट् होताच तेथील ठाणे प्रमुखांची तडकाफडकी बदली केली जात होती. मागील वर्ष-दीडवर्षांत पोलीस ठाण्याला तिसरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलून आला आहे.
तर, येरवडा पोलीस ठाण्यात मात्र कनिष्ठ पातळीवरच बदल केले गेले. तपास पथक महिला अधिकाऱ्याच्या हाती देण्याचा प्रयोग झाला. मात्र, त्यांना कोणतीच मोकळीत नव्हती. फक्त महिलांसंदर्भातीलच गुन्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. यामुळे ही एकप्रकारे नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेकच होती. मागील आवडभरात एकामागोमाग दोन खून झाल्यानंतर तसेच संतप्त शेकडो नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. यानंतरही पोलीस आयुक्तालयाने कोणताच मोठा निर्णय घेतला नाही.
वाढती गुन्हेगारी रोखणे शक्य
पोलिसांनी मनावर घेतले, तर येरवडा आणि हडपसर परिसरांतील गुन्हेगारी रोखली जाऊ शकते. येथे अजून तरी मोठ्या आणि संघटित टोळ्यांचे अस्तित्व नाही. पाच ते दहा रिकामटेकडी टाळकी जमवून शस्त्रे फिरवून दहशत पसरवायची, हा इथला “ट्रेंड’ आहे.
वट निर्माण करण्यासाठी किरकोळ हाणामाऱ्या, खुनासारख्या घटना घडतात. या परिसरांत दारुची बिनधास्त होणारी बेकायदा विक्री जरी बंद केली, तरी निम्मी गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकते. मात्र, लागेबांधे असल्यामुळे हे शक्य होत नसावे. त्यामुळे एकूणच या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खाकी वर्दीचा धाक दिसत नसल्याचे चित्र आहे.
“कोथरूड पॅटर्न’ची पुनरावृत्ती
शहरात एकेकाळी कोथरुड परिसर गुन्हेगारीचे केंद्रस्थान होते. टोळ्या, गॅंगवार, जुन्या वादातून होणारे खून, लूटमार आणि सराईत गुन्हेगारांचा वावर असा सर्व प्रकार तेथे होता. टोळ्यांच्या म्होरक्यांना पळून जाण्यासाठी पुणे-मुंबई, पुणे-बंगळुरू महामार्ग जवळच असल्याचा फायदा होत होता. तर दुसरीकडे मुळशी, वेल्हा परिसरांत जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने तेथील व्यवहारांत मध्यस्थीसाठी गुन्हेगारांना कोथरुड परिसर सोयीचा होता. मात्र, मध्यंतरी वर्चस्ववादातून अनेक सराईत गुन्हेगारांचे खून झाले.
तर दुसरीकडे पोलिसांनी “मोक्का’ लावून म्होरक्यांसह टोळ्यांतील सदस्यांना कारागृहात पाठवले. यामुळे सध्या कोथरुड परिसर शांत आहे. त्यामुळे एकंदरच पुणे शहरच शांत झाले होते. मात्र, मागील काही वर्षांत येरवडा आणि हडपसर परिसर गुन्हेगारीचे नवीन केंद्र बनू लागला आहे. येथील गुन्हेगारी प्रकरणांना त्या-त्या वेळच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही. सध्या लॉकडाऊन आणि कर्फ्यू असतानाही घडलेल्या गुन्ह्यांची संख्या पाहता गुन्हेगारीचा स्फोट झाल्याचे चित्र आहे.