वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
पुणे – पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांनंतर आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यालाही वादळाचा धोका उद्भवला आहे. अरबी समुद्रात उद्भवणारी वादळी परिस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे (एनडीआरएफ) राज्यात 9 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यापैकी मुंबई-3 पालघर-2, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी 1 तुकडी तैनात करण्यात आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या भागात वादळ तयार होत असून, पुढील 48 तासांत तो सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून “एनडीआरएफ’च्या तुकड्या राज्याच्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई वगळता इतर तुकड्या लवकरच पुण्यातून रवाना होणार असल्याचे “एनडीआरएफ’तर्फे सांगण्यात आले आहे.