करोनाचा आढावा घेतल्यानंतर व्यक्त केला विश्वास
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य देश आणि जग करोना विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामूहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार आज (शुक्रवारी) शहरात आले होते. यावेळी त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, करोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. काहीजण या परिस्थितीचेही राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे.
परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडस्ट्री सुरू करायला मान्यता दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्त शहरासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास करोनावर निश्चितच विजय मिळवू असेही पवार म्हणाले.
इंडस्ट्रीच्या अडचणी सोडविणार
पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमधून पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे समोर येत आहेत त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल असे अजित पवार म्हणाले.
हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक
शहरातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. यावर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे. हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे.